- संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात भाजप सत्तेपासून दूर असल्याने केंद्र सरकार ईडीचा वापर करून आमच्यावर सुड उगवत आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला.ते म्हणाले, गेल्या एका वर्षापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. सरकार टिकू देऊ नका. सरकारच्या मोहात पडू नका. आम्ही सरकार पाडण्याची तयारी झाली आहे, असे मला सांगत असून धमकावले जात आहे. पण मी त्यांना बधलो नाही. मीही त्यांचा बाप आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे राऊत म्हणाले, कालपासून आपण सगळे, खासकरुन मीडिया एक प्रश्न विचारत आहे, ईडीच्या नोटीसचे काय झाले? पण ईडी हा महत्त्वाचा विषय नाही. सीबीआय, ईडी किंवा इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना देशात प्रतिष्ठा होती. एखाद्या गुन्ह्या संदर्भात सीबीआय, ईडी, आयकर विभागाने कारवाई करायची म्हटले तर त्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असे वाटत होते, पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणे, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणे असे लोकांनी गृहित धरले आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागत आहेत. ही एक राजकीय कारवाई आहे, ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांना करू द्या. सरकार पाडण्यासाठी भाजपाचा कट आहे.
घरातील महिलांना, कुटुंबीयांना लक्ष्य करणे ही नामर्दानगी आहे. कुणी नामर्दपणे असे वार करत असेल तर शिवसेना जशास तसे उत्तर देईल. तसेच भाजपच्या 120 नेत्यांची यादी आमच्याकडे आहे. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला देश सोडावा लागेल, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. तसेच बायकांच्या पडद्याआडून केलेली खेळी तुमच्यावर उलटल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, वर्षा राऊत उद्या चौकशीला जाणार की नाही याबाबत अद्याप ठरवलेलं नाही. ही राजकीय कारवाई आहे. त्यामुळे याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्चा करुनच निर्णय घेणार आहोत, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.