कोरोनामुळे शिंदे कुटुंबियांवर ओढवला बिकट प्रसंग
वार्ताहर / सावंतवाडी:
कोकणच्या समुद्रकिनारी मध्यप्रदेश येथून ऊंट घेऊन कुटुंब आले होते. मात्र कोरोनामुळे गेले तीन महिने पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प राहिल्याने त्यांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. अखेर हताश झालेले हे कुटुंब उंटाला घेऊनच पायीच मध्यप्रदेशला रवाना झाले. ऊंट चालक सुनील शिंदे यांनी गेल्या तीन महिन्यांत त्यांच्यावर ओढवलेल्या स्थितीबाबत दिलेली माहिती डोळय़ात पाणी आणणारीच होती.
दरवर्षी जानेवारी ते जून या हंगामात मध्यप्रदेश, राजस्थान भागातून ऊंट घेऊन अनेक कुटुंबीय समुद्रकिनारी उदरनिर्वाह करण्यासाठी येतात. यंदा जानेवारीतही ही कुटुंबे सिंधुदुर्गात दाखल झाली. पहिले दोन महिने काही प्रमाणात व्यवसाय झाला. पण मार्च ते मे संपूर्ण पर्यटन हंगामात एक रुपयाही मिळाला नाही. कोरोनामुळे समुद्रकिनाऱयावरील पर्यटन बंद आहे. केव्हातरी लॉकडाऊन उठेल, या आशेवर हे ऊंटधारक राहिले. मात्र आता पावसाळा सुरू होताच या कुटुंबांनी चालतच गावी जाणे पसंत केले आहे. सुनील शिंदे म्हणाले, कोल्हापूरपर्यंत सुमारे 200 कि. मी. अंतर ऊंटाला चालतच घेऊन जाणार आहे. तेथून आमचे अनेक कुटुंबीय एकत्रित होतील अन् मग पुढे कसे जायचे, हे ठरवणार आहोत. गेले कित्येक दिवस उंटासह आम्ही सर्व शिंदे कुटुंबीय उपासमारीला सामोरे जात आहोत.