वेगावर मर्यादा नसल्याने दोघांचे हकनाक बळी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
वार्ताहर /उचगाव
उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉस या मार्गावरील गुळगुळीत रस्त्यावरून भरधाव वेगाने सुसाट गाडय़ा धावू लागल्याने गेल्या एक महिन्यातच अनेक अपघातांची मालिका सुरू असून दोघांना आपले जीव गमवावे लागले आहेत. जर या मार्गावर गतिरोधक घातले असते तर वेगावर मर्यादा आली असती आणि हकनाक दोघांचे बळी गेले नसते. परिणामी या भागातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याचे अंतिम काम झाले. यावेळी या भागातील नागरिक आणि प्रवासी वर्गाने या मार्गावरती गतिरोधक घालून भरधाव वेगाने वाहणाऱया वाहनावरती ब्रेक लागण्यासाठी गतिरोधक घालावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे काम पूर्ण करून सहा महिने होत आले.
मात्र अद्याप या रस्त्यावर गतिरोधक न घातल्याने दुचाकींसह चारचाकी वाहने सुसाट वेगाने ये-जा करत आहेत. सदर मार्ग हा उचगाव-कोवाड तसेच नेसरी, आजरा, गडहिंग्लज या भागाशी जोडला गेल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असते. उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉस या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा अनेक नागरिकांची घरे आहेत.
रस्ता ओलांडताना अनेक वेळा मोठे अपघात
रस्ता ओलांडताना अनेक वेळेला मोठे अपघात या ठिकाणी घडत आहेत. यातीलच एक प्रकार गेल्या दोन दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेले डॉक्टर के. डी. पाटील यांना हाकनाक आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. तर याच मार्गावर एक युवती ठार झाल्याची घटनाही ताजी आहे. याबरोबरच सुसाट वेगाने वाहणाऱया वाहनांमुळे अनेक लहान मोठे अपघात याबरोबरच शेतवाडीत ये-जा करणाऱया शेतकरी व जनावरांचे अनेकवेळा अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या मार्गावर गतिरोधक घालावे .
उचगाव बसस्थानकावर गतिरोधक हवेत
उचगाव बसस्थानकाशेजारी रस्त्याच्या दुतर्फा प्राथमिक मराठी, कन्नड शाळा असल्याने गावातील सर्व विद्यार्थ्यांना हाच रस्ता ओलांडून ये-जा करावी लागते. या ठिकाणी गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने वाहने ये-जा करतानाचे चित्र पहावयास मिळते. या भरधाव वेगाने वाहणाऱया वाहनांचा फटका या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी गतिरोधक घालावेत, अशी मागणी पालक व नागरिकांतून करण्यात येत आहे.