सेन्सेक्समध्ये 476 अंकांची वाढ, एनटीपीसी नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या तिसऱया दिवशी भारतीय शेअर बाजाराने नवी उंच प्राप्त करत बंद होण्यात यश साध्य केलं आहे. यात एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक तेजी साध्य करत बंद झाले आहेत.
बुधवारी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 476 अंकांच्या वाढीसह 58,723.20 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 139 अंकांच्या वाढीसह 17,519.45 अंकांवर बंद झाला. आज सकाळपासूनच बाजाराचा मूड सकारात्मक होता. एकावेळी तर सेन्सेक्स निर्देशांकाने 58,777 आणि निफ्टीने 17,532 अंकांपर्यंत सर्वोच्च मजल मारली होती. टेलिकॉम आणि ऑटो क्षेत्राला पॅकेज मिळण्याच्या बातमीने शेअर बाजार आज बहरात होता. त्यामुळे या क्षेत्रातील समभाग तेजीत होते.
सेन्सेक्समधील 30 पैकी 22 समभाग तेजीसोबत बंद झाले. एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक 7.16 टक्के इतके वाढत तर भारती एअरटेलचे समभाग 4.53 टक्के तेजीसह बंद झाले. एअरटेलचे बाजार भांडवल 4 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. बीएसईवर एसबीआयएन, पॉवरग्रिड, टीसीएस, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि एल अँड टी यांचे समभाग तेजीत होते. तर दुसरीकडे ऍक्सिस बँक, अल्ट्राटेक, एशियन पेंटस्, नेस्ले, सनफार्मा यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले होते. टायटन आणि एचसीएल यांचे समभागही 2 टक्के वाढ दर्शवत होते. आयटी आणि सरकारी बँकांच्या समभागांमध्ये तेजी होती. बीएसईवर बाजार भांडवलाने पहिल्यांदाच 259 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. बीएसईवर 3 हजार 421 समभागांवर व्यवहार झाला, ज्यात 2055 समभाग तेजीसह बंद झाले. याआधी मंगळवारीही सेन्सेक्स (69 अंक वाढ) व निफ्टी (24 अंक वाढ) तेजीसह बंद झाले होते. बीएसईवर 416 समभागांना अप्पर सर्कीट लागले तर 181 समभागांना लोअर सर्कीट लागले. यंदा चांगला मान्सून झाल्याने कृषी रसायन व खतांसंबंधातील समभागांची खरेदी करायला हरकत नसल्याचे मत तज्ञांनी नोंदवले आहे. त्याचप्रमाणे धातू व सिमेंट क्षेत्रातील समभागांची खरेदी करायला हरकत नसल्याचा सल्ला देण्यात आला आहे.