मुख्यमंत्री धामी याची घोषणा
उत्तराखंड निवडणुकीवरून अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्याच्या निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी जनतेला मोठे आश्वासन दिले आहे. शपथग्रहणानंतर त्वरित समान नागरिक संहिता आणू. ही संहिता लागू करण्यासठी विशेष समिती स्थापन केली जाईल. निवृत्त न्यायाधीश आणि बुद्धिवंतांसोबत अन्य संबंधित घटकांची एक समिती स्थापन करणार असल्याचे धामी म्हणाले.
भाजप सरकार सत्तेवर आल्यावर शपथग्रहणानंतर त्वरित ही समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती उत्तराखंड राज्याच्या लोकांसाठी समान नागरिक संहितेचा मसुदा तयार करणार आहे. या समान नागरिक संहितेची व्याप्ती विवाह, घटस्फोट, जमीन-मालमत्ता आणि वारस यासारख्या विषयांवर लागू होणार असल्याचे धामी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
समान नागरिक संहिता सर्व धर्मांच्या लोकांवर समान स्वरुपात लागू होणार आहे. समान नागरिक संहिता ही घटनाकारांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. भारतीय घटनेचे कलम 44 च्या दिशेने देखील हे प्रभावी पाऊल असेल. देशाच्या सर्व नागरिकांसाठी समान नागरिक संहितेची कल्पना देखील यातून साकार होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी समान नागरिक संहिता लागू करण्यावर जोर दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
समाजात धर्म, जाती अणि समुदायाच्या पारंपरिक रुढी आता मागे पडत आहेत. देवभूमीत सर्व नागरिकांच्या हितांचा आदर करत सर्वस्पर्शी विकासाची धारणा सुनिश्चित करत ‘समान नागरिक-समान अधिकार’ लागू करण्याची वेळ आता आली असल्याचे धामी यांनी म्हटले आहे.
भाजप खासदार अनिल बलूनी यांनी मुख्यमंत्री धामी यांच्या विधानाचे कौतुक केले आहे. समान नागरिक संहितेमुळे समाजात एकरुपता येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे संघटन मंत्री बी.एल. संतोष यांनीही धामी यांच्या घोषणेला ऐतिहासिक ठरविले आहे.
तर धामी यांच्या विधानानंतर उत्तराखंडमधील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या गरिमा दसौनी यांनी मुख्यमंत्र्याचे वक्तव्य खोटे आश्वासन असल्याची टीका केली. भाजप स्वतःला पराभवापासून वाचविण्यासाठी अशाप्रकारची विधाने करत आहे. मागील 5 वर्षांपासून भाजपने विकासासाठी काहीच केले नसल्याचे काँग्रेस प्रवक्त्याने म्हटले आहे.