असंख्य भाजप कार्यकर्त्यांचा पाठिंबा, मोन्सेरात यांची पणजीत अडचण वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे माजी मुख्यमंत्री व ज्यांच्यामुळेच पणजीकर जनतेने सलग 24 वर्षे भाजपच्या उमेदवार निवडून दिला. त्या स्व. मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचा वाढदिवस आज असल्याने त्या निमित्ताने पणजीतील असंख्य भाजप कार्यकर्ते महालक्ष्मी मंदिरात एकत्र येत असून उत्पलांच्या राजकीय प्रवासाला येथून आज प्रारंभ होणार आहे.
पणजीतील राजकारण हळूहळू बदलत असून पणजीची जनता मूळ भाजप नेत्याच्या शोधात आहे. विद्यमान आमदार बाबू मोन्सेरात यांची जादू हळूहळू ओसरत चालली आहे. भाजप कार्यकर्ते आज पणजीत महालक्ष्मी मंदिरात सकाळी 9 वा. मोठय़ा संख्येने एकत्र येणार आहेत व त्याच दरम्यान उत्पल पर्रीकरांसाठी महालक्ष्मी मंदिरात साकडे घातले जाईल. त्याचबरोबर उत्पल पर्रीकर यांच्या राजकीय प्रवासाला आजच मुहूर्त सापडणार आहे.
विद्यमान भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात मूळ भाजप कार्यकर्त्यांनी वातावरण तापविले असून उत्पल पर्रीकर यांना भाजप सोडण्यास भाग पाडू नये असे कळकळीचे आवाहन या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना केले आहे. सध्या मोन्सेरात यांना पणजी मतदारसंघात खुद्द भाजप नेत्याविरुद्धच संघर्ष करावा लागत आहे. अलिकडेच त्यांनी केलेल्या दिल्ली दौऱयात त्यांनी नेमकी कोणाची भेट घेतली ? याबाबत तर्क वितर्क व्यक्त करण्यात येत आहे. मोन्सेरात यांना प्रदेश भाजपचा रिमोट कंट्रोल ज्या व्यक्तीच्या हाती आहे, अशा एका पदाधिकाऱयाचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र प्रदेश भाजपच्या कित्येक पदाधिकाऱयांनी पर्रीकर यांच्या चिरंजीवाला प्रथम प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.
उत्पल पर्रीकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला असून त्यांच्याबाजूने सहानुभूतीची लाट आहे. पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्याबाजूने उभे राहिलेले असल्याने मोन्सेरात यांची पणजीत अडचण वाढण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत काँग्रेस पक्षाने मोन्सेरात यांना परत काँग्रेसमध्ये घ्यायचे नाही, असे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर पणजीत भाजप विरुद्ध भाजप अशी थेट लढाई आता सुरू झालेली आहे आणि उत्पल पर्रीकर यांचा आज होणार असलेला राजकीय प्रवेश ही एका संभाव्य राजकीय प्रवासाची नांदी ठरणार आहे. उत्पल हे अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार होते. स्व. मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार वितरणानिमित्त नवी दिल्लीला गेल्या उत्पल यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली की नाही हे समजू शकले नाही. परंतु उत्पल यांची राजकारणातील एन्ट्री ही भाजपसाठी एक महत्त्वाची वाटचाल ठरणारी आहे.