ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढला आहे. दिवसाला दीड दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
385 दिवसातही कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकता आलेलं नाही. उत्सव, टाळ्या-थाळ्या आता खूप झाल्या. आता लोकांना व्हॅक्सीन द्या, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. सरकारच्या धोरणांमुळेच देशातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दुसरीकडे लसींची कमतरता जाणवत आहे. शेतकरी-मजदूर संकटात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. छोटे उद्योग धंदे बंद होत आहेत. मध्यमवर्गही त्रस्त झाला आहे.
पंतप्रधान मोदी तुम्ही म्हणाला होता की कोरोना विरोधातील लढाई 18 दिवसांत जिंकली जाईल. तुम्ही टाळ्या- थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाइलचा लाईट देखील लावायला लावला मात्र कोरोना वाढतच गेला. आता दुसरी लाट आहे आणि लाखो लोकं कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्यात बंद करा आणि जे आपले गरीब बांधव आहेत. त्याना उत्पन्नासाठी पूर्णपणे सहकार्य करा, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, लसींची निर्मिती करणाऱ्या आवश्यक ती साधनसामुग्री पुरवली पाहिजे. त्यांना सुविधा द्या, म्हणजे लसीचे उत्पादन वाढेल. सध्याच्या गतीने लसीकरण सुरू राहिलं 75 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असेही ते म्हणाले.