प्रतिनिधी/ कराड
सातारा जिल्हय़ातील काँग्रेसजनांसाठी दीपावलीचा सण नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे. ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा गट युवा नेते ऍड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात सक्रीय होणार आहे. येत्या 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान कराडमध्ये निवडक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्यात काका-बाबा गट एकत्र येणार आहेत.
विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या उपस्थितीत कोयना दूध संघावर दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होतो. शनिवारी ऍड. उदयसिंह पाटील, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, प्रा. धनाजी काटकर, रंगराव थोरात, पै. जगन्नाथराव मोहिते, हणमंतराव चव्हाण, आप्पासाहेब गरूड यांच्यासह निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छोटेखानी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात उदयसिंह पाटील यांनी काँग्रेस पक्षात सक्रीय होत असल्याचे सांगत जिल्हय़ात पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले.
राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात 6 ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान जिल्हय़ाच्या दौऱयावर येत आहेत. साताऱयात महसूलची आढावा बैठक, काँग्रेस भवनास भेट देऊन ते दुपारी कराडला येणार आहेत. सायंकाळी येथे थोरात यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील उंडाळकर, ऍड. उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. थोरात यांचा दौरा निश्चित आहे. मात्र तारीख निश्चित नाही. मात्र 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. तारीख निश्चितीनंतर याबाबत कार्यकर्त्यांना कळवले जाईल. मात्र सर्वांनी कार्यक्रमास गर्दी करू नये. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्स पाळून निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत भूमिका स्पष्ट करताना ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले की, विलासकाकांनी सर्वसामान्य माणसांच्या ताकदीच्या जोरावर संघटना वाढवली. ही संघटना चालवणे ही माझी व सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता संघटना काय असते ते दाखवून दिल्यानंतरच पदाचा विचार करणार आहोत. काकांच्या संघटनेची ताकद मोठी आहे. मात्र पक्षीय विचारधारा नसल्याने लोकांचे प्रश्न सोडवण्यात अडचणी येत होत्या. ज्यांच्याकडे ताकद नाही, अशा लोकांकडून आपणास त्रास होत होता. त्यामुळे मुळ काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे.
पद काय मिळणार, याची चर्चा कार्यकर्त्यांनी न करता आपला प्रभाव दाखवून देऊ देऊ. आपण काँग्रेसमध्ये सक्रीय होत असल्याने काही शक्तींना बरे वाटणार नाही. असे लोक तुम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. कराडमध्ये होणाऱया मेळाव्यात सर्वांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तरीही कार्यकर्त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपले मार्गदर्शक काकांनी काँग्रेस पक्षात काम सुरू करायचे आहे. पक्षाकडे काहीही मागायचे नाही, असे सांगितले आहे. त्यानुसार आपली संघटना काँग्रेस पक्षात सक्रीय होत आहे. गेल्या 10 वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. अनेकांनी पक्ष सोडले. मात्र काकांनी कधीही काँग्रेस विचारधारा सोडली नाही. आता काळाची गरज आणि सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी उंडाळकर गट पक्षात सक्रीय होत आहे. कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून पक्षवाढीसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन प्रा. धनाजी काटकर यांनी यावेळी सांगितले.
वसंतराव जगदाळे यांनी, विलासकाका काँग्रेस पक्षात सक्रीय होत असताना त्यांचे वडील दादा उंडाळकर यांनी, मुलाला कोणतेही पद देऊ नका. त्याला अगोदर संघटनेत काम करू दे, असे त्यावेळी सांगितले होते. त्याच पावलावर पाऊल ठेवून उदयसिंह पाटील यांनी काँगेस पक्षाकडे कोणतेही पद न मागता प्रथम संघटनेत सक्रीय होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.