अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला भक्तीचा महिमा वर्णन करून सांगत आहेत. ते म्हणाले, भक्तिमार्गाने जात असताना माझ्या गुणांचे वर्णन करताना किंवा हरिकथा, नामसंकीर्तन करताना तेथे विघ्नाचा त्रास होऊ शकत नाही. परिणामी भक्तांना मोक्षाची द्वारे खुली होतात. माझे भक्त पूर्ण निरिच्छ असतात. म्हणूनच मी श्रीकृष्ण त्यांच्या भावार्थावर भुललेला असतो. उद्धवा! भाग्याशिवाय ही माझी भक्ती खरोखर कोणालाच घडावयाची नाही. कोटय़वधी जन्मात मिळणारी पुण्याची संपत्ती जर पदरी आयती तयार असेल, तरच माझ्या संतांची संगती घडते सत्संगतीने माझी भक्ती उत्पन्न होते. सत्संगानेच भक्तीची प्राप्ती होते. माझी भक्ती संतांपाशी वाट पहात उभी असते. संतांची सेवा करायचे मला कारण काय? असे विचारशील, तर संतांनी मला आपल्या भक्तीने बांधून टाकले आहे असे समज. ते जगामध्ये माझ्याशिवाय दुसरा कोणताही अर्थ जाणत नाहीत. त्यांनी त्यांचे स्वकर्म, धर्म, देह, घर, रूप, नाम आश्रमधर्म, मलाच अर्पिलेले असतात. अरिष्टं ओढवली असताही ते धैर्याने माझ्यापासून ढळत नाहीत. आकाश तुटून पडले असताही आश्रयासाठी ते माझ्यावाचून दुसऱयाची वाट पहात नाहीत. म्हणूनच मी श्रीकृष्ण त्यांचा दास होऊन राहिलो आहे. भावार्थाचा महिमा मोठा आश्चर्यकारक आहे. मी विश्वात्म्याचाही ते आत्मा झालेले आहेत. असे ते आणि मी एकरूप झालेलो आहोत, म्हणूनच मला पुरुषोत्तमाला त्यांनी वश केले आहे. संतांना आणि मला कल्पांतांतसुद्धा भिन्नभाव नाही, हे लक्षात ठेव. असे आत्मज्ञान झालेले संत केवळ जगदोद्धार करण्यासाठी जगात आलेले असतात गीतेच्या चौदाव्या अध्यायात भगवंत त्यांच्याबद्दल सांगतात, आत्मज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे । जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ।14.2। भगवंत संतांची कामे करण्यास फार उत्सुक असतात. तुकोबारायांच्या अभंगांमध्ये आपण ते पाहिलंच आहे. संत अमृतरायही देव संतांची कामे कशी करत असतात त्याचे सुंदर वर्णन केले आहे. ते असे, भक्ताचिया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी, सोडली मी लाज रे ।1।
धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागे पुढे ।
घाली अंगणात सडे, सोडूनिया लाज रे ।2 वेडी गवळीयांची पोरे, त्यांचे ताक प्यालो बा रे । खातो भिल्लीणीची बोरे, उच्छि÷ाची चोज रे ।3 दुर्योधन सदनी गेलो, विदुराच्या गृहा आलो । आवडीने कण्या प्यालो, जोंधळय़ाची पेज रे ।4।
पुर्णब्रम्ह म्हणती माते, पुर्णब्रम्ह मीच त्यांते । ऐसी याची जाणीव ते, म्हणे अमृतराय रे ।5 उद्धवा ! तू माझा प्रिय सेवक, हितेच्छू आणि सखा आहेस, ऐकण्यासाठी इच्छुकपण आहेस म्हणून आता मी तुला एक अत्यंत गोपनीय परम रहस्य सांगणार आहे. तू सुहृद आणि प्रिय मित्र आहेस. हे गुह्यातले गुह्य मी कोणालाच सांगितले नाही. पण तू माझा जिवलग मित्र व सोबती आहेस आणि माझ्यावर तुझे अप्रतिम प्रेम आहे. तू माझा अनन्य भक्त आहेस आणि त्या भक्तीप्रमाणे तुझ्या अंतःकरणांत विरक्तीही आहे. तुझ्यापाशी पूर्ण निष्कपट वृत्ती आहे. यादवकुलात पहायला गेले तर माझ्यासारखा एक तूच आहेस. तू माझ्या समान योग्यतेचा व माझा गोत्रज असून माझा सेवक आहेस आणि तोसुद्धा कामापुरता सेवक नव्हेस, तर सर्वस्वी विश्वासु आहेस. तुझे एक एक गुण किती म्हणून वर्णन करू ? खरोखर हे सांगतांना मला अत्यंत हर्ष होत आहे. म्हणूनच हे गुह्य, तुझ्यापासून चोरून ठेवायचा मला धीर होत नाही. असे म्हणून भगवंताने उद्धवाला हृदयाशी हृदय भिडवून आलिंगन दिले, तेव्हा कुठे चिदानंदरूप श्रीकृष्ण संतुष्ट झाला. मग कृष्ण म्हणाला, सावधपणाने नीट लक्ष लावून माझे भाषण आदरपूर्वक ऐक. हे माझे गुह्मज्ञान तुला मिळाले असता तुझ्यामुळे सर्व वंशाचा उद्धार होईल. कारण, ज्या वंशांत ब्रह्मज्ञानी उत्पन्न होतो, तो वंश त्याच्यामुळे पावन होतो. हे माझे भाषण अगदी सत्य आहे असे समज. ह्याविषयी मनात विकल्प आणू नकोस. ते ऐकून भगवंतांचे सांगणे ऐकण्यासाठी उद्धव सरसावून बसला. श्रीकृष्णाने उद्धवाला कोणते गुह्यातले गुह्य सांगितले ते आपण पुढील अध्यायात पाहू.
अध्याय अकरावा समाप्त