अध्याय अकरावा
नाथमहाराजांनी स्वतः घेतलेल्या अनुभूतीतून वर्णन केलेल्या भगवंतांच्या सुंदर मूर्तीचे महात्म्य सांगताना भगवंत म्हणाले, ह्या माझ्या मूर्तीच्या दर्शनाने डोळय़ांचे पारणेच फिटते. हे दर्शन जन्ममरणाचे धरणे उठविते आणि विषयाचे खतपत्र फाडून टाकते. माझी मूर्ती पाहिल्यानंतर योगयागाची खटपट करावी लागत नाही, गिरिविहारांत जावे लागत नाही किंवा अनेक प्रकारच्या संकटातही पडावे लागत नाही. आसन, पात्र, ह्यांची किंवा समाधीचे साधनही लागत नाही. उद्धवा ! माझ्या प्राप्तीला मुख्य कारण माझी भक्तीच आहे हे लक्षात ठेव. माझी पूजेची स्थाने अकरा आहेत, त्या ठिकाणी याप्रमाणे माझे आवाहन करून मी सांगितलेल्या मूर्तीचे लक्षपूर्वक ध्यान करावे. माझी पूजा करावी, माझे ध्यान करावे, माझे कीर्तन करावे, माझ्या नामाचे स्मरण करावे, माझे गुण वर्णन करावे. रात्रंदिवस माझी कथा करावी, रात्रंदिवस माझ्या चरित्रांतील गोष्टी सांगाव्यात, असे रात्रंदिवस माझे ध्यान करणे यालाच खरी भक्ती असे म्हणावे. दिव्याची ज्योत हातात आली की, साऱया घरभर प्रकाश पडलेला आढळतो, त्याप्रमाणे जेव्हा माझ्या मूर्तीकडे लक्ष वेधून राहाते, तेव्हाच सर्व ज्ञान हाती येते. उद्धवा ! ह्या वर्णनावरून असे लक्षात आण की, सगुण आणि निर्गुण ही दोन्ही एकच आहेत. सच्चिदानंदाचे सुखही दोहोंपासून सारखेच प्राप्त होते असा पूर्ण निश्चय ध्यानात ठेव. सोन्याच्या लगडीला जो कस लागतो, तोच त्याच्यातील वालभर सोन्यालाही लागतो. त्याप्रमाणे सगुण किंवा निगुण ह्यांच्या उपासनेने आत्मानंदात काही अंतर पडत नाही.
म्हणून सगुण आणि निर्गुण ही दोन्ही निश्चयपूर्वक एकच आहेत. साखरेचा सगळा ढीग किंवा त्यातील मूठभर साखर ह्या दोहीत गोडी सारखीच असते. हे माझे अंतकरणातील ध्यान आहे. तेथे मन निरंतर जागृत ठेवून माझ्या भक्तांनी अत्यंत हर्षाने माझी पूजा करावी. उद्धवा ! पण तू आपल्या मनात असे म्हणशील की, ही भक्ती कोणत्या उपायाने साध्य होणार ? तर ही ज्या साधनांनी साध्य होते, ते सर्व तुला सांगेन.
नाना प्रकारचे योगयाग, वापी, कूप, बने, सरोवरे, उत्तमोत्तम श्रौतस्मार्त अशी कर्मे करून ज्यांनी ती मला अर्पण केली, तीच यथासांग झाली म्हणून समजावे. मला अर्पण न करता सतकर्मे जरी केली किंवा तलाव, विहिरी वगैरे बांधल्या, तरी ती दोन्ही व्यर्थच होत. सत्कर्म झाले तरी ते मला अर्पण केल्यानेच यथासांग होते. कर्मे मला अर्पण करीत असतानासुद्धा एखादे वेळी त्या भक्ताचे मन काही तरी विघ्ननिवारक फळाची इच्छा करते, तशी इच्छा त्याला होऊ नये म्हणून भक्ताला मी कधीही विघ्न येऊ देत नाही लक्षात ठेव. सकाम कर्मकर्त्याला अत्यंत प्रयासानेसुद्धा जे प्राप्त होत नाहीत, ते उत्तम लोकातील सर्व भोग मी माझ्या भक्तांना देत असतो. जो माझा अंतःकरणपूर्वक भक्त असून दिव्य भोगाविषयी विरक्त असतो, तो ते भोग भोगत असतानाही माझे स्मरण करीत असतो. म्हणून तो त्या भोगात आसक्त होत नाही. एखादा साधु देवालयात जात असताना मुसळधार पावसामुळे आडोशासाठी जर अकस्मात नकळत वेश्येच्या घरात शिरला तर तो तेथे राहुनही त्या वेश्येला शिवत नाही. त्याप्रमाणे दिव्य भोगाला भक्त कंटाळतो आणि मी फसलो गेलो असे म्हणून अनिवार पश्चात्तापाने कपाळ बडवून घेऊन हरीचे स्मरण करतो. अशा अनुतापाच्या स्थितीमध्ये तत्काळ ते सर्व भोग नष्ट होतात आणि ज्या घरात माझी भक्ती वास करीत असते त्या घरी तो महान् ज्ञानी जन्मास येतो. त्याला पूर्वसंस्कारांच्या साहचर्याने सर्व विषयांची विरक्तीच प्राप्त होते, तो जन्मतःच भक्तिमार्गाला लागतो. तो मुक्तीला लाथेने झुगारून देऊन सर्वस्वाने मलाच भजत असतो. अशा प्रकारे मी आपल्या भक्तांना विघ्नाचा स्पर्शसुद्धा होऊ देत नाही. ते जेव्हा तलाव, विहिरी इत्यादि परोपकारांची कर्मे करतात किंवा जेव्हा योग-याग व त्यागीपणा ह्यांचे साधन करतात, तेव्हा त्यांना माझी भक्ती उत्पन्न होते.
क्रमशः