अध्याय अकरावा
नामकीर्तनानेच वाणी कशी धन्य होते, ह्याचे निरूपण भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, जो अखंड रामनामाचा जप करतो त्याची वाणी पवित्र असते. रामनामाचा जप थांबला की तीच वाणी खोटे बोलून मलिन होऊ लागते. तिला परनिंदेची घाण सुटते. त्या वाणीची जी दुर्गंधी असते ना, ती मला सुद्धा सहन होत नाही. असत्य व परनिंदा करणारी वाणी मला बिलकुल आवडत नाही. याउलट जे माझे नाम घेतात ते धन्य होतात कारण मनुष्य जन्माला येऊन काय मिळवायचे असते ते त्यांनी बरोबर ओळखले असते. माझी नामे, कर्मे आणि गुणांची कीर्ति ही जगाला पवित्र करतात व महान दोषांना नष्ट करतात. हरिनामस्मरणाने जड जीवांचा उद्धार होतो. माझी नामे आणि माझी कर्मे वर्णन केली, तर त्या वक्त्याला माझीच पदवी प्राप्त होते आणि माझ्या लीलावतारांचे कीर्तन केले तर कीर्तन करणारांना आत्मप्राप्ती होते. त्यावर उद्धवाने विचारले की, “भगवंता तू अतीत असा ब्रह्मस्वरूप आहेस. मग तुला गुण, नाम आणि कर्म तरी कशाचे ? आणि कीर्तनधर्म तरी घडणार कसा ?’’ भगवंत म्हणाले, उद्धवा ! असे तू मनात आणू नकोस. मी आपल्याच मायेच्या आश्रयाने आपल्या लीला करतो, अनेक अवतार धारण करतो आणि सर्वांचे पालन व संहार करतो. सर्व अवतारांमध्येही उत्तमोत्तम अशी श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादिकांची जन्मकर्म, त्यांची नाना प्रकारची चरित्रे व लीला जे अखंड गायन करतात त्यांना आत्मप्राप्ती होते. श्रीरामाने सहज लीलेने सेतु बांधिला व समुद्रामध्ये दगडाना तरावयास लावले, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत खेळता खेळता उचलला व दावाग्नि गिळून टाकला. श्रीरामाने एका बाणानेच त्राटिका मारली, श्रीकृष्णाने तान्हेपणातच पूतनेला शोधून मारिली. श्रीरामाने पायाने अहल्येचा उद्धार केला. श्रीकृष्णाने यमलार्जुन दोघेही उद्धरिले. जे धनुष्य उचलताना रावणही आदळून पडला, तेच धनुष्य मोडून श्रीरामाने सीतेला वरले, श्रीकृष्णाने शिशुपालादि सर्वांना जिंकून भीमकराजाची कन्या (रुक्मिणी) आणली.
श्रीरामाने सुबाहु, खर, दूषण यांना मारले. श्रीकृष्णाने अघासुर, बकासुर, केशी, यांना मारले. श्रीरामाने सुग्रीवाला राज्य देऊन त्याची सिंहासनावर स्थापना केली, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने उपसेनाला सिंहासनावर बसविले. श्रीरामाने वानरांचा समुदाय जमवून राक्षसकुळाचा वध केला. श्रीकृष्णाने बाळगोपाळ जमवून सर्व मल्लांना मारून टाकले. श्रीरामाने रावण व कुंभकर्ण मारले, श्रीकृष्णाने कंस व चाणूर यांचा वध केला. श्रीरामाने वाली वानराला फसविले. श्रीरामाने बिभीषणाची राज्यावर स्थापना केली. एक बापाच्या आज्ञेकरिता वनवासाला गेला, तर दुसरा गुरुमातेच्या मृतपुत्राला घेऊन आला. ही अवतारचरित्रे वर्णन करून, पूर्वी चोरटा असलेला कोळी थोर वाल्मीकि ऋषि झाला आणि व्यास हा जारिणीचा पुत्र पण या अवतारचरित्रगायनानेच त्याला त्रिभुवनांत श्रे÷ करून सोडले. या दोन्ही अवतारांची महती वर्णन करता करताच दोघेही महाकवि झाले. व्यास-वाल्मीकांना देवांनीही वंदन करून स्तुतिस्तोत्रांनी त्यांना गौरविले आहे. त्या महाकवींची काव्यकथा शेषाने दोन सहस्र नेत्रांनी ऐकली तरीसुद्धा त्याची तृप्ती झाली नाही. हीच कथा स्वर्गामध्ये श्रवण करण्यासाठी इंद्र बृहस्पतीच्या चरणी लागला. ही काव्ये अवतारचरित्रांची कीर्ति त्रिभुवनात वर्णन करीत असतात. माझ्या नावाचे केवळ स्मरण करण्यानेही मी अजामिळ ब्राह्मणाचा उद्धार केला. हरिनामस्मरणानेच गजेंद्राचा उद्धार झाला. पक्ष्याच्या निमित्ताने राम ह्या दोन अक्षरांचे स्मरण केल्यावर महापातकांची रांगच अशी जी कुंटीण तिचाही तत्काळ उद्धर झाला. वेदशास्त्रातील शब्दज्ञानसुद्धा माझ्या नामापुढे फिके आहे. वेदशास्त्रांचा अर्थ समजणे कठीण आहे तसे माझे नाम कठीण नाही. पठण केले तरी वेदशास्त्र उच्चारल्याने मजमध्ये प्रवेश होत नाही. पण सहजगत्या माझे नाम घेतले तरी तो माझा आवडता होतो.
क्रमशः