आज सर्वपक्षीय बैठक – 13 ऑगस्टपर्यंत कामकाज चालणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्या, 19 जुलैपासून सुरू होत आहे. सोमवारपासून 13 ऑगस्टपर्यंत जवळपास 19 दिवस सभागृहाचे कामकाज होणार आहे. अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होणार असला तरी रविवारी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे. संसद अधिवेशन यशस्वी करण्यासाठी या बैठकीमध्ये एकत्रित चर्चा होणार असल्याचे समजते. तथापि, या बैठकीला कोणकोणते विरोधी पक्ष हजेरी लावतात याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
पावसाळी अधिवेशनात सरकार अनेक विधेयके सादर करू शकते. विविध राज्यांमधील आरक्षणाच्या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर संसदेत त्यासंबंधी गंभीरपणे चर्चा होऊ शकते. आरक्षणाचा अधिकार राज्यांना देण्यासंबंधीचे विधेयकही सभागृहात मांडले जाऊ शकते. तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘सहकार’ खात्यावरही सरकार आपली भूमिका संसदेत स्पष्ट करू शकते. दुसरीकडे विरोधकही इंधन दरवाढ, महागाई आणि बेरोजगारी अशा अनेक विषयांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. तसेच देशातील कोरोनास्थिती, कोरोना लसीकरण या मुद्यांबरोबरच उत्तर प्रदेशमध्ये झालेला हिंसाचार, धर्मांतर, काश्मीरमधील निर्बंध, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी हे मुद्देही चर्चेत येऊ शकतात.
संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या नियोजनाला संसदीय समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. सध्या कोरोना संसर्गही नियंत्रणात आल्यामुळे आणि बहुतांश संसद सदस्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे पूर्वनियोजित तारखांनुसार अधिवेशन पार पडेल. अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन करणे अनिवार्य असेल. संसदेत प्रवेश करणाऱया सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतलेला असणे आवश्यक आहे. तसेच संसदेत खासदारांसाठी सुरक्षित अंतर राखून आसनव्यवस्था ठेवण्यात येणार आहे.