केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी : शाळा-कॉलेज-क्लासेस बंदच राहणार : मच्छिमारीसह कृषीविषयक कामांना मुभा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून लॉकडाऊनच्या दुसऱया टप्प्याला प्रारंभ झाला आहे. या लॉकडाऊनदरम्यान सुरू करण्यात येणाऱया सेवा-सुविधांसंबंधी केंद्र सरकारकडून रविवारी नवी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्यात आली. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार 20 एप्रिलनंतर छोटे उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त अनुमती देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे, कृषीसंबंधी कामे, मच्छिमारी आणि त्यासंबंधी पूरक व्यवसायांनाही अनुमती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासियांनी संबोधित करताना लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत वाढविली होती. तसेच काही सेवा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे (गाईडलाईन्स) बुधवारी घोषित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानुसार बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही तत्वे प्रसिद्ध करण्यात आली. त्यांनुसार कृषी क्षेत्रासाठी बहुतांश बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. तसेच छोटे उद्योगधंदे सुरू करण्याला परवानगी देत सरकारने उद्योजक आणि कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस लॉकडाऊनची मुदत संपेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागांमधील उद्योगधंद्यांना निर्बंधांमधून मुभा देण्यात आली आहे. प्रवासी विमानसेवा आणि प्रवासी रेल्वेसेवा पूर्णतः बंद राहणार आहेत.
काय बंद राहणार?
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रवासी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. केवळ सुरक्षा आणि मालवाहू विमानांना उड्डाणाची अनुमती दिलेली आहे. तसेच प्रवासी रेल्वे, परिवहन बस, मेट्रोसेवाही ठप्प राहणार आहे. एका जिल्हा-राज्यातून दुसऱया जिल्हा-राज्यात जाण्यावरील बंदीही कायम ठेवण्यात आली आहे. हॉटेल्स, टॅक्सी, कॅब, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, सिनेमागृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, शिएटर, बार-रेस्टॉरंट यांचे ‘लॉकडाऊन’ही कायम ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक सोहळेöकार्यक्रमांवरील बंदीही कायम ठेवण्यात आली असून मंदिर, मशीद, चर्चसह सर्व धार्मिक स्थळे 3 मे पर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी 20 हून अधिक लोकांनी उपस्थित राहू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वैद्यकीय सेवा, उत्पादन निर्मिती सुरूच
देशभरातील सर्व रुग्णालयने, नर्सिंग होम, औषध दुकाने, जनौषधी केंद्रे, मेडिकल लॅब, मेडिकल कलेक्शन सेंटर्स ‘लॉकडाऊन’ काळातही सुरू ठेवण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच औषधांचा पुरवठा करणारी वाहने, ऍम्ब्युलन्स यांच्या सेवा आणि वैद्यकीय उत्पादन करणाऱया कंपन्याही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
वृत्तपत्रे, केबल सेवाही सुरू राहणार
वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कामकाजही सुरू ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच केबल सेवाही सुरू राहणार आहे. त्याचबरोबर आयटी क्षेत्रातील सेवा सुरू ठेवण्यासाठी फक्त 50 टक्के कर्मचाऱयांच्या उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. कुरियर सर्व्हिस, कोल्ड स्टोरेज, वित्तीय सेवा, बँका, एटीएम, वेअरहाऊस स्टोरेज, खाजगी सुरक्षारक्षक सेवा, व्यवस्थापन सेवा आदींनाही सरकारकडून अनुमती देण्यात आली आहे.
छोटय़ा उद्योगांना दिलासा
महापालिका क्षेत्राबाहेरील ग्रामीण भागातील कारखाने सुरू ठेवण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. 20 एप्रिलनंतर हे कारखाने उद्योजक सुरू करू शकतील. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे. तसेच विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) कारखाने आणि अत्यावश्यक सेवांची निर्मिती करणाऱया उद्योगांनाही अनुमती दिलेली आहे.
बँका, वित्तक्षेत्राला सूट
रिझर्व्ह बँक, राष्ट्रीयीकृत बँका व त्यांच्या शाखा, खासगी बँका व त्यांच्या शाखा, शेअरबाजार, एटीएम, एनपीसीआय, सीसीआयएल, देय व्यवस्था (पेमेंट सिस्टिम), धनव्यवस्थापक उद्योग, बँकांचे माहिती तंत्रज्ञान कक्ष, खासगी बँका, इतर वित्तसंस्था यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम सुरू करण्याची मुभा आहे.
पशुपालन व्यवसायास अनुमती
दूध व दुधाच्या पदार्थांचे उत्पादन, संकलन आणि वाटप, या पदार्थांची वाहतूक आणि पुरवठा साखळी सुरू होणार आहे. चहा, कॉफी व इतर घरगुती उपयोगाची पेये, त्यांचे उत्पादन, वितरण, विक्री आणि पुरवठा साखळी सुरू होईल. पशुपालन, कुक्कुट पालन व त्यासंबंधीचे व्यवसाय यांना सशर्त अनुमती देण्यात आली आहे.
वाहतूक सुरू होणार
जीवनावश्यक वस्तूंसह इतर अनेक वस्तूंची राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य वाहतून सुरू केली जाणार आहे. या वस्तूंचे लोडींग, अनलोडींग, बंदरे, महामार्ग, नदी वाहतूक, आयसीडी, मालवाहतुकीसंबंधी आयातशुल्क कामे, इत्यादी सुरू केली जाणार आहेत.
सामाजिक क्षेत्राला बव्हंशी मुभा
अनाथ मुलांची वस्तीस्थाने, विद्यार्थी वस्तीगृहे, दिव्यांग वस्तीगृहे, मतीमंद, गतीमंदांची आश्रयस्थाने, महिला वस्तीगृहे, अनाथ महिला वस्तीगृहे, विधवा वस्तीगृहे, अल्पवयीन मुलांची आश्रयस्थाने व निरीक्षण केंद्रे, स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतन सेवा, भविष्यनिर्वाह निधी सेवा व कार्यालये, अंगणवाडय़ांमधील अन्नपुरवठा, स्तनपान करणाऱया महिलांचा पोषक आहार, इत्यादी कार्ये सुरू ठेवली जाणार आहेत.
20 एप्रिलनंतरच्या स्थितीवर बरेच काही अवलंबून
एकंदर, 20 एप्रिलनंतर केंद्र सरकार सर्व जिल्हय़ांचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग नियंत्रणा आहे, तेथे वरील सर्व सेवा व उद्योग सुरू करण्याची अनुमती देणार आहे. अर्थात, पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी घोषित केल्याप्रमाणे हे सर्व निर्णय परिस्थितीची अनुकूलता पाहून घेण्याची सूचना राज्य सरकारांनाही देण्यात आली आहे. 20 एप्रिलपर्यंत मात्र, लॉकडाऊनच्या नियमांचे अतिकठोर पद्धतीने पालन करण्यात येऊन नंतर निर्णय घेतला जाणार आहे.