प्रतिनिधी / पणजी
राज्यातील उद्योग, कारखाने, कंपन्यामध्ये कामगारांना 12 तास काम करण्यासाठी (शिफ्ट) अनुमती देण्यात आली असून तशी अधिसूचना फॅक्टरी बॉयलर्स खात्याने जारी केली आहे. कोरोनामुळे अनेक उद्योगांना तूट आली असून ती भरून काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
कोरोना संकटामुळे अनेक कामगार कामाला जाऊ शकले नाहीत आणि उद्योगांना अतिरिक्त कामगार मिळाले नाहीत. त्याचा परिणाम उद्योगांवर, उत्पादनावर होऊन अनेक उद्योग तोटय़ात गेले. तूट भरून काढण्यासाठी 12 तासांची शिफ्ट देण्याची मागणी उद्योगांकडून करण्यात आली होती. ती सरकारने मान्य केली असून त्यासाठी काही नियम, अटी लागू केल्या आहेत.
तीस सप्टेंबरपर्यंत लागू अधिसूचना
खात्याचे निरीक्षक विवेक मराठे यांनी ती अधिसूचना काढली आहे. येत्या 3 महिन्यांसाठी म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत ती लागू रहाणार आहे. यापूर्वी कामगारांना 8 तासांची शिफ्ट होती. ती आता 4 तासांनी वाढवून 12 तासांची करण्यात आली आहे. त्याकरीता कायद्यातील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत.
दिवसांपेक्षा अधिक दिवस सलग काम करू नये
कामगार आठवडय़ाच्या सुटी दिवशी काम करत असेल तर त्यांना त्वरित एक ते दोन महिन्यात भरपाईची सुटी देण्यात यावी. उद्योग बंद पडू नयेत, त्यांचे आणखी नुकसान होऊ नये आणि ते अधिक सक्षम व्हावेत म्हणून हा 12 तासाची शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओव्हरटाईमसह (जादा काम) आठवडय़ातील एकूण तासांची संख्या 60 पेक्षा जास्त नसावी व कामगारांनी सात दिवसांपेक्षा अधिक दिवस जादा काम करू नये, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाचे संकट अजूनही कायम असून अनेक उद्योगांना कामगारांची उणीव भासत आहे. ती उणीव भरून काढण्यासाठीच जादा तास काम करण्याची शिफ्ट मिळावी अशी मागणी उद्योगांकडून होत होती. ती सरकारने मान्य केली असून त्या शिफ्टला मान्यता दिली आहे.