प्रतिनिधी / पुणे :
राज्यकर्त्यांना मराठा आरक्षण द्यायचेच नसून, त्यांची तशी इच्छाशक्तीही नाही. आजचे राजकारणी व्यक्ती केंद्रित झाले आहेत. मात्र जर समाजाचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल करीत मराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी असल्याचे मत खासदार छत्रपती उदयनराजे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. दरम्यान, दोन्ही छत्रपती घराण्यांना फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही, असे खासदार संभाजीराजे यांनी नमूद केले.
उदयनराजे भोसले यांनी खासदार संभाजीराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन खासदारांची सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोर्ट कचेऱ्यांवर आपला विश्वास नसल्याचेदेखील उदयनराजे यांनी म्हटले आहे.
उदयनराजे म्हणाले, संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. आम्ही दोघेही एकाच घराण्यातील आहोत. आम्ही कधीही जात पाहिली नाही. आज मात्र जाणवत आहे. बोलताना मित्र अंतर ठेवत आहेत. राज्यकर्त्यांनी ही दुफळी निर्माण केली आहे. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. राज्यकर्त्यांची इच्छा असेल, तर समाजासाठी त्यांनी एकत्र आले पाहिजे. ही दुफळी संभाजीराजे किंवा मी निर्माण केलेली नाही. मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचे असते, तर मागेच दिले गेले असते. पण यांची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला, तर त्याला जबाबदार हेच असतील. त्यावेळी हा उदेक ना उदयनराजे थांबवू शकतील, ना संभाजीराजे. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, आम्हाला बाजूला केले जाईल. अशी वेळ येऊ देऊ नका. मात्र, अशी वेळ येऊ शकते, असा इशारा उदयराजे यांनी दिला.
मराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी
मराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. जर हे सगळे आमदार, खासदार एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील, तर नेमकी समस्या काय आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडून द्या. मी सगळ्यांबद्दलच विचारतोय. हे सभागृहात गेल्यावर एक बोलतात आणि बाहेर आल्यावर दुसरे बोलतात. मराठा आरक्षणासाठी राज्याने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी छत्रपती उदयनराजे यांनी केली आहे.
केंद्राच्या भूमिकेसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले, दम असेल तर अधिवेशन बोलवावे. आधी राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावे. नंतर मी केंद्राचे पाहतो. अधिवेशन बोलावून गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर चर्चा करावी. आता जस्टीस भोसले यांचा रिपोर्ट आला आहे. थप्पी गोळा करुन काय रद्दीत विकून त्यावर राज्य चालवणार का? काय फालतुगिरी सुरु आहे, असा संताप व्यक्त करताना उदयनराजेंनी यांना आधी अधिवेशन घेऊ द्या, मग रुपरेषा ठरवतो. मग एकेकाला कसे गाठायचे ते मी बघतो, असे सुनावले.
दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही : संभाजीराजे
दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभालू करणे आमच्या रक्तात नाही. म्हणून आपण उदयनराजेंची भेटी घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचे एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. आम्ही पूर्वीपासून एकमताने काम करत आलो आहोत. मी पाच मागण्या मांडल्या असून मंजूर केल्यास स्वागत करु शकतो. समाज बोलला आहे, लोक बोललेत आणि लोकप्रतिनिधींनी बोलणे गरजेचे आहे. अधिवेशनाच्या माध्यमातूनही हा प्रश्न मार्गी लागू शकतो. बऱयाच वर्षानंतर सातारा आणि कोल्हापूर घराणे एकत्र झाल्याचा आनंद या वेळी त्यांनी व्यक्त केला.
सकारात्मक होत असेल, तर स्वागतच
अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज भेटीवर बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांना आशिर्वाद घ्यायचा असेल. त्या भेटीत काय झाले याची माहिती नाही. ही भेट होणार आहे, याची मला कल्पना नव्हती. काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे’, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.