प्रतिनिधी /पणजी
राजभवनात उभारलेल्या नव्या दरबार हॉलच्या उद्घाटनानिमित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उद्या 3 मार्च रोजी संध्याकाळी 6 च्या दरम्यान गोव्यात पोहोचतील आणि 4 मार्च रोजी दरबार हॉलचे उद्घाटन करून संध्याकाळी ते पुन्हा दिल्लीला रवाना होतील.
राजभवनात 7 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या दरबार सभागृहाचे क्षेत्रफळ 1 हजार 665 चौरस मिटर आहे. राजभवनातील जुन्या सभागृहाची क्षमता केवळ 150 लोकांचीच होती. विविध राज्यसणांचे कार्यक्रम तसेच शपथविथी कार्यक्रम याच सभागृहात आयोजित केले जात होते. कमी जागेअभावी मर्यादीत अतिथीना निमंत्रीत केले जात होते. गरज म्हणून बाहेर मंडप उभारण्यात येत होता. त्यासाठी अतिरिक्त खर्च होत होता. आता नवीन सभागृहात अधिक अतिथी सहभागी होऊ शकतील. नवीन दरबार सभागृहात कार्यक्रमांशिवाय क्रीडा, योग आदी घेतले जाऊ शकतात.