प्रतिनिधी / उस्मानाबाद
रासायनिक खताची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने नळदुर्ग व परिसरातील तपासणी केली असता तीन खत विक्रेते जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले. तिन्ही दुकानांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी दिली.
तुळजापूर तालुक्यातील श्रावणी ॲग्रो एजन्सीज, नळदुर्ग, श्री समर्थ कृषी सेवा केंद्र, मुर्टा, संघवी शेती उद्योग, नळदुर्ग या खत विक्री केंद्राने खताच्या एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याचे आढळून आले.त्याअनुषंगाने खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदीनुसार तपासणी अहवाल पुढील कारवाईसाठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील खत विक्री केंद्राने शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र/गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलक/दरफलकावर नोंद न करणे इ. प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उमेश घाटगे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेबाबत व दराबाबत काही अडचण/तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार देण्याचे तसेच 02472-223794 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.