प्रतिनिधी / उस्मानाबाद
शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असल्याने सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे, या अगोदरही आपण जनतेच्या समस्या सोडवत होतोच पण आता त्याहुन अधिक जनतेला आधार देण्याची गरज असुन यामध्ये शिवसैनिकांनी कुठेही कसुर सोडु नये असे अवाहन जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी केले.तालुक्यातील विविध गावातील विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.तीन गावाना जवळपास दिड कोटीहुन अधिकच्या निधीतुन विकासकामे करण्यात येत आहेत.
यामध्ये रांजणी गावात स्थानिक आमदार विकास निधीतून सुमारे पंधरा लाख रुपयातून बांधण्यात येणाऱ्या रांजनी-लासरा रस्त्यावरील पुलाचे, २५:१५ योजनेतून आणि जनसुविधा योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याचे,पाझर तलावाचे अशा एकूण २७ लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. याशिवाय लासरा येथे जलजीवन मिशन अंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आणि २५:१५ मधुन मंजुर झालेल्या कामाचे, जनसुविधा, तांडा वस्ती सुधारणा या योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे अशा एकूण १४ लाख रुपयांच्या कामांनाही प्रारंभ यावेळी करण्यात आला. वाकडी (इ) येथे ३०-५४ योजनेतून मुख्य रस्त्यापासून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरसाठी सुमारे एक कोटी रुपये याशिवाय २५:१५ चा निधी,जनसुविधा, तांडा वस्ती या योजनेतून करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे अशा सुमारे एक कोटी १२ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आमदार पाटील याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमुळे जिल्ह्यात रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत. स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व वर्षानुवर्षे फक्त चर्चेत असलेले मराठवाडा कृष्णा प्रकल्पाचे पाणी प्रत्यक्षात आपल्या भागात येत आहे. जुन 2023 पर्यंत हे पाणी आपल्या तालुक्यातही येणार आहे, दुधाळवाडी प्रकल्पापर्यंत हे पाणी यावे यासाठी खास प्रयत्न केले.परिणामी त्याला मंजुरी मिळाल्याने या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र आता ओलीताखाली येणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.