भंडारी समाज फोंडा तालुका समितीची मागणी
प्रतिनिधी /फोंडा
बिगर गोमंतकीयांकडून पैसे घेऊन समाजाचे दाखले दिले जातात, हा ऍड. आतिष मांद्रेकर यांनी केलेला आरोप आक्षेपार्ह आहे. त्यांनी तो एकतर सिद्ध करावा किंवा मागे घ्यावा अशी मागणी गोमंतक भंडारी समाज फोंडा तालुका समितीचे अध्यक्ष विश्वनाथ नाईक यांनी केली आहे.
मुळात जातीय दाखले केंदीय समितीकडून दिले जात नाहीत, तर ते तालुका समितीकडून दिले जातात. ही गोष्ट ऍड. मांद्रेकर यांनी ध्यानात घ्यावी. तसेच समाजामध्ये फूट घालणारे बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा सल्लाही विश्वनाथ नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. यावेळी तालुका समितीचे उपाध्यक्ष शेखर नाईक, दादी नाईक, सचिव हेमंत नाईक व दिलीप नाईक हे उपस्थित होते. समाज बांधवांना जातीचे दाखला देताना ग्रामसमितीमार्फत पूर्ण पडताळणी करुनच अर्ज पाठविले जातात. या अर्जांची तालुका समितीकडून योग्य शहानिशा केली जाते. तसेच एक प्रत तालुका समितीकडे ठेऊन दुसरी प्रत केंद्रीय समितीकडे पाठविली जाते. समाजासंबंधी काही मुद्दय़ांवरुन मतभेद असल्यास ते समाजाच्या व्यासपीठावर सोडवावेत. जाहीर आरोप करू नयेत. समाजात दुफळी घालणारे राजकारण करू नये, असेही ते म्हणाले. केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी समाजातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. वैद्यकीय शिक्षणांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 27 टक्के आरक्षणाच्या मार्ग त्यांच्या प्रयत्नातूनच मोकळा झाला. शिवाय सरकारी नोकऱयांमध्ये बाराशे नोकऱयांचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. अध्यक्ष म्हणून त्यांना तीन वर्षांसाठी निवडून दिले आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांना काम करण्याची संधी द्यावी. पैशांच्या अफरातफरीच्या प्रश्नावर तालुका समिती बोलू शकत नाही. कारण तो विषय केंद्रीय समितीचा आहे, असेही विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.