नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी एअरटेलने मेमध्ये जवळपास 46 लाखहून अधिक मोबाइल ग्राहक गमावले असल्याची माहिती आहे. दुसरीकडे प्रतिस्पर्धी कंपनी रिलायन्स जियोने मात्र मे मध्ये 35 लाख मोबाइल ग्राहक जोडले आहेत. सदरची माहिती दूरसंचार क्षेत्रातील नियामक ट्राय यांच्याकडून उपलब्ध झाली आहे.
भारतीय मोबाइल बाजारात मे मध्ये 62 लाख ग्राहक घटले असल्याची बाबही स्पष्ट झाली आहे. जियोने मात्र आपल्या ताफ्यात 35 लाखहून अधिक ग्राहकांची भर घातली असून आता त्यांची ग्राहकसंख्या 43 कोटींवर पोहचली आहे. एअरटेल व वोडाफोन आयडिया या दोन्ही कंपन्यांनी मे मध्ये मोठय़ा प्रमाणात ग्राहक गमावले आहेत. एअरटेलची एकूण ग्राहकसंख्या आता 34 कोटी इतकी आहे. वोडाफोन आयडियाची ग्राहकसंख्या आता 27 कोटीवर राहिली आहे.