प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना संकटकाळात देखील आंतरराष्ट्रीय एअरो इंडिया शो 2021 साठी बेंगळूर सज्ज झाले आहे. बुधवारपासून तीन दिवस 13 व्या आवृत्तीचा एअरो शो चालणार आहे. या शोला चालना देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मंगळवारी दुपारीच बेंगळुरात दाखल झाले आहेत. तीन दिवस ते येथेच वास्तव्य करणार आहेत.
नवी दिल्लीहून बेंगळूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर राजनाथ सिंग यांचे राज्याचे वनमंत्री अरविंद लिंबावळी यांनी स्वागत केले. यलहंका येथील वायूदलाच्या विमानतळावर अनेक देशांची विमाने चित्तथरारक कसरती सादर करण्यासाठी सज्ज आहेत. बुधवारपासून तीन दिवस एअरो इंडिया शोसह संरक्षण विषयक प्रदर्शनही भरविण्यात येत आहे. यामध्ये 78 विदेशी कंपन्या सहभागी होत आहेत. देशातील संरक्षण संस्था डीआरडीओ, एलआरडीई इस्रो, एनएएल, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड, बीएचईएल, बीईएल यासारख्या अनेक कंपन्याही यामध्ये सहभागी होऊन आपली उत्पादने सादर करणार आहेत. यावेळी अनेक देशांमध्ये संरक्षण उत्पादनविषयक करार होतील.
अलिकडेच भारतीय वायूदलात समाविष्ट होण्यासाठी सज्ज असणारे तेजस-2 या आवृत्तीच्या लढाऊ विमानाचा कृती आराखडाही तयार झाला आहे. लघु लढाऊ विमान तेजस-1 या विमानाची अनेक टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. मागील दोन एअरो इंडिया शोमध्ये या विमानाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. मागील दोन वर्षात तेजस विमानामध्ये एचएएलने अनेक बदल केले आहेत. संरक्षण मंत्रालयाने देखील त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे स्वदेशीनिर्मित तेजस-2 ची क्षमता कमी असेल, याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.
कोरोना परिस्थितीमुळे एअरो शो साठी निवडक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होणाऱयांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची आहे. अलिकडेच अनेक देशांचे संरक्षणमंत्री, संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱयांचे शिष्टमंडळ देखील बेंगळूरमध्ये दाखल झाले आहेत. कोणत्याही अडचणींशिवाय यशस्वीपणे एअरो पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय वायूदलामध्ये अत्याधुनिक विमाने खरेदीकडे भारताचा कल आहे. याचा विचार करून अमेरिका, रशिया, फ्रान्स यासह अनेक देशांनी आपले मोठे शिष्टमंडळ पाठवून दिले आहे.
एचएएलकडून नवा इतिहास -राजनाथ सिंग
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) ने इतिहास रचला असून हे स्वाभिमानाचे संकेत आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे. बेंगळूरच्या दोड्डनेक्कुंदी येथील एचएएलच्या केंद्रात तेजस मार्क-2 या लढाऊ विमानांच्या उत्पादनाला अधिकृतपणे चालना दिल्यानंतर ते बोलत होते.
स्वदेशीनिर्मिती तेजस मार्क-2 ची निर्मिती हे स्वाभिमानाचे आणि आत्मनिर्भरचा संदेश आहे. ही केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगाने दखल घेण्याजोगी गोष्ट आहे. एचएएलचा दुसऱया प्लांटचे उद्घाटन करणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. देशातील संरक्षणविषयक विविध एजन्सींना एकत्र येण्यासाठी एअरो इंडिया शो हे उत्तम व्यासपीठ आहे, असेही ते म्हणाले.
तेजस मार्क-2 हे विमान निर्मितीमुळे एचएएल नवा इतिहास रचणार आहे. कोरोना संकटकाळातही एचएएलचे दुसऱया प्लांटचे उद्घाटन करणे हे आपल्या देशाची क्षमता आणि स्वाभिमानाचे संकेत आहे, असेही त्यांनी सांगितले.