कडेपूर येथे स्वाभिमानीचा शेतकरी मेळावा
प्रतिनिधी / कडेगाव
केंद्रातील भाजप सरकारच्या अखत्यारीतील निती आयोगाच्या एफआरपीचे तीन टप्पे करण्याच्या शिफारशीला राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या महाविकास आघाडी सरकारने ही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार बरोबरच राज्यातील महाआघाडीचे सरकारही शेतकरी विरोधी आहे हे दाखवून दिले आहे. तेव्हा यावेळी एकरकमी एफआरपी घेणारच आहे शिवाय त्यापेक्षा अधिक दर कारखानदारांनाकडून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा देण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
कडेपूर (ता.कडेगाव) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा, महेश खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूला कुणीही उरले नाही. म्हणूनच परमेश्वराला साकडे घातले आहे. केंद्र सरकाराच्या अखत्यारीतील नीती आयोग व कृषिमूल्य आयोग आहे. त्यांनी उसाची एफआरपी तीन टप्प्यात देण्यासंदर्भात शिफारस केली आहे. त्या संदर्भात देशातील पंधरा राज्यांकडून शिफारशी मागविल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने तीन टप्प्यात एफआरपीला पाठिंबा दिला आहे. यामध्ये ऊस गाळप झाल्यानंतर एका महिन्यात साठ टक्के, गाळप हंगाम संपल्यानंतर वीस टक्के व उर्वरित आगामी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी वीस टक्के द्यावा अशी शिफारस केली आहे. राज्य व केंद्र सरकार यांनी मिळून शेतकरीवर्गाचा विश्वासघात केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार व केंद्र सरकार मधील नेतेमंडळी भांडणाची नाटके करीत आहेत . दुसऱ्या बाजूला शेतकरी वर्गाला अडचणीत आणण्यासाठी एकत्र काम करीत आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, महेश खराडे , यु.ए.संदे,ऍड. सुभाष पाटील, बाळासाहेब जाधव, अजमुद्दीन मुजावर, धनाजी माळी, प्रवीण पाटील आदी मान्यवर, स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…मग सांगलीतील कारखान्यांना का जमत नाही
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, कुंभी-कासारी व दत्त शिरोळ या तीन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. मग सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना का जमत नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.
Next Article उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.