कोल्हापूर जोतिबाला जाताना काळाचा घाला : कार-ट्रकमध्ये बार्शी तालुक्यात भीषण अपघात
प्रतिनिधी/ वेळापूर/वैराग
जोतिबाच्या दर्शनासाठी निघालेल्या सोलापूर जिल्हय़ातील वैराग येथील फलफले कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. वेळापूरजवळ कार आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात फलफले कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना वेळापूरजवळ 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:45 च्या दरम्यान घडली. यात माय-लेक गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अ]िधक माहिती अशी, वैराग येथील फलफले कुटुंबीय शनिवारी पहाटे वैराग येथून वेळापूरमार्गे ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असताना, वेळापूर येथील डिसलरीजवळ सकाळी होंडा सिटी कार (एमएच 13 सीजी 5599) व माळशिरसकडून आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रक (एमएच 09-2099) यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले.
या अपघातामध्ये शिवराज नागेश उर्फ भगवंत फलफले (वय 42), दिनानाथ उर्फ बाबासो भगवंत फलफले (वय 36), वनिता शिवराज फलफले (वय 30), उत्कर्ष शिवराज फलफले (वय 11), उत्कर्षा ऊर्फ ऊन्नती शिवराज फलफले (वय-7), पार्वती महादेव फलफले (वय-75) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पुजा दिनानाथ ऊर्फ बाबासो फलफले (वय 30), मुलगी सई दिनानाथ फलफले (वय 5) या माय-लेकी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी पूजा फलफले व सई फलफले त्यांच्यावर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने ट्रक उलटून कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. ट्रक ड्रायव्हरने अपघातानंतर पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच वेळापूर पोलीस स्टेशनचे सपोनि दीपक जाधव, दिलीप जाधव, विनोद साठे यांनी घटनास्थळी जात अपघाताची माहिती घेऊन जखमींना स्थानिकांच्या मदतीने अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यातील मृतांना वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
वैराग गावावर शोककळा
अपघाताचे वृत्त समजताच वैरागमध्ये शोककळा पसरली. फलफले कुटुंबीय हे मुख्यमंत्री सहायता कक्ष अधिकारी ओमप्रकाश शेटे यांचे मेव्हणे आहेत. यातील घरातील कर्ता पुरूष शिवराज फलफले यांच्यासह त्यांची पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे त्यांचे संपूर्ण कुटुंब या अपघातात ठार झाले आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे फलफले कुटुंबीय
वैराग येथील फलफले कुटुंबीय सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे. त्यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या माध्यमातून दिव्यांगाना मोफत जयपूर फुट व साहित्य, आरोग्य शिबीर, हायमास्ट दिवे, अनेक गोरगरीब रुग्ण, शालेय विद्यार्थी आदींना विविध शिबिराच्या माध्यमातून मदत केलेली आहे.
दोन वर्षातील दुसरी घटना
दोन वर्षापूर्वी वैराग येथे शिलवंत कुटुंबात विवाहासाठी जाताना कर्नाटक राज्यात अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू ओढवला होता. तोही दिवस शनिवारच होता. आजही शनिवारी फलफले कुटुंबीय देवदर्शनासाठी जात असताना एकाच कुटुंबातील सहा जणांना मृत्यूने कवटाळले. अशा होणाऱया अपघातात सहाजण मयत होण्याची ही दोन वर्षातील दुसरी मोठी घटना आहे.
ते फोटो ठरले शेवटचेच
जोतिबाच्या दर्शनासाठी निघालेल्या फलफले कुटुंबीयांनी सगळीकडे देवदर्शन घेत घेत आपला प्रवास सुरु केला होता. पंढरपूर जवळील नारायण चिंचोली येथे सुर्यनारायणाचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्या दर्शनाचे फोटो मित्रपरिवार व नातेवाईकांना पाठवले. त्यानंतर ते वेळापूरमार्गे जात असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि त्यात सहा जण दगावले त्यांचे ते फोटो शेवटचेच ठरले अशी चर्चा होती.