कोरोना स्थितीत सुधारणा, मात्र, दक्षता हवीच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या एक महिन्यात प्रथमच नव्या कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांखाली आली आहे. सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये नव्या रुग्णांची संख्या 1 लाख 96 हजार 427 इतकी नोंद करण्यात आली होती. याच कालावधीत 3 हजार 511 रुग्णांचा मृत्यू झाला असून ही संख्याही गेल्या 21 दिवसांमधील सर्वात कमी आहे. 14 एप्रिल या दिवशी 1 लाख 84 हजार 372 रुग्ण आढळून आले होते. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
या चोवीस तासांमध्ये 3 लाख 26 हजार 850 रुग्ण बाधामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशभरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 25 लाख 86 हजार 782 पर्यंत खाली आली आहे. आतापर्यंत व्याधीमुक्त झालेल्यांची संख्या आता 2 कोटी 40 लाख 54 हजार 861 इतकी असून एकंदर रुग्णसंख्या 2,69,48,874 आहे. बाधितांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱयांचे प्रमाणही 1.14 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.
राज्यांचा विचार करता आजही महाराष्ट्र नवे रुग्ण आणि मृत्यू यांच्यात आघाडीवर आहे. या चोवीस तासांमध्ये या राज्यात 592, कर्नाटकात 529, तामिळनाडूत 404, दिल्लीत 207, केरळामध्ये 196, पंजाबमध्ये 187, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 153, उत्तराखंडमध्ये 122 आणि राजस्थानात 103 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, अशीही माहिती देण्यात आली.
70 टक्के मृत्यू अन्य आजारांमुळे
कोरोनाच्या या उद्रेकात कारोनामुळे मृत झालेल्यांपैकी 70 टक्के लोकांना अन्य आजारही होते. त्यामुळे निरोगी माणसाचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. मृत्यूदरही आता पुष्कळच कमी झाला आहे. तथापि, कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नसून त्यासाठी बराच कालावधी जावा लागणार आहे. त्यामुळे आणखी प्रदीर्घ काळपर्यंत मास्कचा उपयोग करणे आणि सामाजिक अंतर तसेच इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. यात कोणतीही ढिलाई नव्या उद्रेकाला जन्म देऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.