अन्यथा पाठिंबा गृहित धरू नका-एनजीओ
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव नगरपालिका निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी युती केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी ही युती आवश्यक होतीच. मात्र, राज्यात भाजपचे सरकार स्थापन करताना गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपला पाठिंब्याचे पत्र दिलेले होते. ते पत्र अद्याप मागे घेण्यात आलेले नाही. त्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्ष आजही एनडीएचा घटक ठरतो. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तो दूर करण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाने सात दिवसांच्या आत एनडीएतून बाहेर पडावे अशी मागणी ‘एक पावल एकचाराचे’ या एनजीओने केली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी भाजपवर चौफेर टीका केली होती. मात्र, जेव्हा सरकार स्थापन करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी सरळ भाजपकडे हात मिळवणी करून सरकार स्थापन केले. त्यांच्या या भूमिकेमुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर होता. आत्ता ते सरकारात नाही. परंतु, पाठिंबा दिलेले पत्र मागे न घेतल्याने ते एनडीएचे घटक ठरतात. अशा वेळी त्यांनी मडगाव पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडे युती केली तरी मतदारांमधील संभ्रम दूर झालेला नाही. उद्या गोवा फॉरवर्डचे उमेदवार निवडून आले तर ते पुन्हा भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता नाकारली जात नसल्याच्या प्रतिक्रीया मतदारांमधून व्यक्त होत आहे.
त्यामुळे विजय सरदेसाई यांनी एनडीएतून बाहेर पडावे व पुन्हा कधीच भाजपकडे संपर्क ठेवणार नाही हे स्पष्ट करावे लागणार असल्याचे एक पावल एकचाराचे या एनजीओने मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला रेमी बोर्जिस, जॉय डिसिल्वा, प्रेडी त्रावासो, विराज नागवेकर व शंकर पोळजी उपस्थितीत होते.