आमदार सतीश जारकीहोळी यांचा आंदोलनाला पाठिंबा
वार्ताहर /अगसगे
एपीएमसीतील सरकारी भाजी मार्केट टिकविणे ही सरकारची जबाबदारी आहे. या दुष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच जिल्हाधिकाऱयांचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करू या आणि यापुढे पुढील दिशा ठरविण्यात येईल. भाजी मार्केट दुकानदारांनी छेडलेल्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असे उद्गार यमकनमर्डीचे आमदार व केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी काढले.
मंगळवार दि. 8 रोजी दुपारी आमदार सतीश जारकीहोळी यांनी एपीएमसीतील आंदोलक भाजी दुकानदार आणि भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौड मोदगी यांची भेट घेऊन चर्चा केली.
आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले की, एपीएमसीमध्ये सुसज्ज भाजी मार्केट उभारण्यासाठी आपण तीन वर्षे प्रयत्न केले आहेत. सरकारने हे भाजी मार्केट उभारण्यासाठी सुमारे 80 कोटी रुपये खर्च केले आहेत. याठिकाणी सर्व सोयी सुविधा आहेत. असे असताना खासगी भाजी मार्केटला परवाना दिला आहे. यामुळे सरकारी भाजी मार्केटवर याचा परिणाम झाला आहे. तरी सरकारने सर्वप्रथम सरकारी भाजी मार्केट टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे न झाल्यास आपण पर्यायी भाजी मार्केट बांधून देऊ.
भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष सिद्धगौड मोदगी म्हणाले की, जय किसान भाजी मार्केट उभारण्यात येत असताना एका आमदाराने ती जागा कृषक जमीन असल्याचा दावा करत याठिकाणी भाजी मार्केट होऊ देणार नाही म्हणून कामकाज बंद पाडले होते. त्यावेळी तेथील दुकानदाराने त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते आमदार स्वतः गैरमार्गाने त्या खासगी भाजी मार्केटला परवानगी मिळवून देऊन त्याचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मोदगी यांनी केला.
अनेकांचा पाठिंबा
जय किसान भाजी मार्केट विरोधात छेडलेल्या एपीएमसीच्या भाजी दुकानदारांच्या व शेतकरी, नेत्यांच्या आंदोलनाला माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आमदार संजय पाटील, कागवाडचे शशिकांत जोशी, रयत संघटनेचे नेते अप्पासाहेब देसाई, तसेच शेतकरी संघटना व महिला संघटनांनी पाठिंबा दिल्याचे सिद्धगौड मोदगी यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.