व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्राशी निगडीत व महत्त्वपूर्ण समजला जाणारा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम म्हणून आज सर्वदूर एमबीए अभ्यासक्रमाची गेली दोन दशके सर्वदूर ओळख आहे. विभिन्न विद्यापीठांशिवाय व्यवस्थापन शिक्षण संस्थांतर्फे एमबीए अभ्यासक्रमांचे संचालन करण्यात येते. व्यवस्थापन, व्यवसाय क्षेत्राच्या प्रचलित व प्रस्तावित गरजा लक्षात घेऊन एमबीए अभ्यासक्रमाचे नियोजन व्यवस्थापनाशी निगडित अशा मार्केंटिंग, आर्थिक व्यवस्थापन, एचआर, स्टॅटेजी मॅनेजमेंट, संगणक शास्त्र याचे विशेष शिक्षण, प्रशिक्षण एमबीए अभ्यासक्रमांद्वारा दिले जाते. आता बदलता काळ व व्यावसायिक गरजांनुरुप एमबीए अभ्यासक्रम, अभ्यासक्रम शिकविणाऱया शिक्षण संस्था, व्यवस्थापन-व्यवस्थापन व मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या बदलांना सामोरे जावे लागत आहे. त्याचाच हा मागोवा.
यासंदर्भात जागतिक पार्श्वभूमी पडताळून पाहता असे दिसून येते की, दरवषी करोडो विद्यार्थी व्यवस्थापनशास्त्र विषयक शिक्षण घेत असतात. ऑक्टोबरमध्ये यासंदर्भात ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन काउंन्सिलतर्पे व्यवस्थापन अभ्यासक्रम विषयक विशेष अहवाल प्रकाशित केला आहे. व्यवस्थापन शास्त्र विषयातील पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे प्रमाण 33 टक्के तर विद्यार्थीनींचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे 20 टक्के आढळून आले. तर या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात मात्र विद्यार्थीनींचे प्रमाण 26 टक्के तर विद्यार्थ्यांचे प्रमाण 28 टक्के दिसून आले. याशिवाय याच अहवालात ही बाब पण स्पष्ट झाली आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्थापन विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱयांची लक्षणीय व सर्वाधिक संख्या चीन व भारतामध्ये आढळून येते.
अभ्यासामध्ये जागतिक स्तरावर प्रकर्षाने जाणवलेली वस्तुस्थिती म्हणजे सद्यस्थितीत व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱया विद्यार्थ्यांपैकी अधिकांश विद्यार्थ्यांकडे व्यवसायाचे अद्ययावत ज्ञान नसते. ही बाब व्यवस्थापक म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वावर मर्यादा आणतात. परिणामी या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी पात्रतेच्या जोडीलाच व्यावसायिक ज्ञान व त्याच्याशी निगडित तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण संबंधित विद्यार्थ्याला घ्यावे लागते. ही बाब खर्चिक व वेळ घेणारी असते.
भारतातसुद्धा यासंदर्भात वेगळी स्थिती नाही. शिवनाडर विद्यापीठाच्या मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप विभागाचे डीन डॉ. विवेक चॅनर्जी या मुद्याला दुजोरा देतात. त्यांच्यामते व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या फेररचनेची मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यांच्या मते बदलती व्यवसायिक स्थिती व व्यवस्थापनाच्या गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांची फेररचना ही काळाची गरज आहे.
डॉ. विवेक बॅनर्जी व्यवस्थापनशास्त्र विषयातील अनुभव व अभ्यासाच्या आधारे स्पष्ट करतात की एमबीए वा व्यवस्थापनशास्त्र विषयांच्या पदवी व पदव्युत्तर या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये अद्ययावतता व तंत्र कुशलता आणण्यासाठी संगणक शास्त्राच्या जोडीलाच माहिती तंत्रज्ञान व त्याचे विश्लेषण, तंत्रज्ञानावर आधारित बुद्धिमत्ता, मशीनवर आधारित शिक्षण, प्रशिक्षण, ऑनलाईन पद्धतीवर आधारित विक्री व्यवस्थापन, ई कॉमर्स, तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय पद्धती इ. चा समावेश करणे अनिवार्य ठरले आहे. याशिवाय व्यवसायाचे मानसशास्त्र अभियांत्रिकी व व्यवसाय व्यवस्थापनाचा समन्वय, परस्पर संबंधांवर आधारित व्यावसायिक प्रगती याची जोड देण्यावर डॉ. बॅनर्जी यांचा विशेष आग्रह आहे. व्यवस्थापनशास्त्र विषयांशी संबंधित व एमबीए पात्रताधारकांशी निगडित या मुद्यांच्या गांभीर्याला कोरोनाकाळच्या आव्हानपर गांभीर्याची साथ लाभलेली दिसून येते. देशव्यापी सर्वेक्षणानुसार 2020 मध्ये देशांतर्गत एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करणाऱयांपैकी 54 टक्के उमेदवारांना रोजगार मिळाले तर 2021 मध्ये म्हणजेच कोरोना दरम्यान व त्यानंतर हीच टक्केवारी कमी होऊन 46 टक्के एवढी झाली आहे. सर्वेक्षणात नमुद केल्यानुसार राष्ट्रीय स्तरावर युवा उमेदवारांच्या रोजगार क्षमतेचे गेल्या चार वर्षातील सरासरी टक्केवारी वा प्रमाण 46 टक्के असताना एमबीए पात्रताधारकांची 46टक्के रोजगारक्षमता नक्कीच चिंतनीय ठरते. यासंदर्भात संख्यात्मक स्वरुपात सांगायचे म्हणजे आपल्याकडे दरवषी सुमारे 3.5 लाख विद्यार्थी एमबीएची पदव्युत्तर पदवी पात्रता पूर्ण करतात. या साऱयांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुरुप रोजगार मिळणे हे मोठे आव्हानपर काम ठरते.
गेल्या दशकात देशातील एमबीए अभ्यासक्रम चालविणाऱया व्यवस्थापन संस्थांमध्ये फार मोठी वाढ झाली. यामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या खासगी व्यवस्थापन शिक्षण संस्थांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांची वाढती संख्या त्यानुरुप त्यांच्या अपेक्षा व रोजगार पात्रता याचा ताळमेळ न बसल्याने या विद्यार्थ्यांच्या बेकारीमध्ये सातत्याने वाढ होत गेली. दरम्यान गेली दोन वर्षे कोरोनाकाळातील टाळेबंदी काम मंदीमुळे अधिकारी व्यवस्थापक स्तरावरील उपलब्ध रोजगार संधी जवळजवळ ठप्पच झाल्याने स्थितीची गंभीरता अधिकच वाढली. उद्योग व्यवस्थापन व शैक्षणिक संस्था यांच्यादरम्यान बदलत्या काळानुरुप आवश्यक त्या गरजा अपेक्षा यामध्ये पूर्वापार चालत आलेली तफावत व त्यानुरुप आवश्यक धोरणात्मक निर्णय यांची अंमलबजावणी न होणे याचाही एकूणच परिस्थितीवर विपरित परिणाम होत गेला. यासाठी व्यवसाय उद्योग व व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये अधिकाधिक समन्वय व सामंजस्य आवश्यक आहे. त्यादृष्टीने विविध प्रयत्न सुरू असून त्याला अधिक गती मिळणे नितांत आवश्यक आहे.
कोरोनाकाळात एमबीए पात्रताधारकांना रोजगार नोकरीच्या संधी जवळजवळ नगण्य स्वरुपात मिळाल्या. मात्र त्याचवेळी काही कल्पक व हिमती एमबीए पात्रताधारकांनी स्टार्टअपसारखे कल्पक प्रेरक व व्यावसायिकदृष्टय़ा आणि आर्थिक स्वरुपात सक्षम अशा स्वरुपाचे जे पर्यायी स्वयंरोजगार निर्माण करून त्यांचे यशस्वी संचालन करून दाखविले त्याला तोड नाही. यामुळे आव्हानपर परिस्थितीवर मात करू शकण्याचे मनोबल नवागत एमबीए पात्रताधारकांनी सिद्ध केले आहे. नीती आयोगाद्वारा पुरस्कृत अटल संशोधन केंद्र व त्याच्या माध्यमातून स्टार्टअप सुरू करण्याच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या आहेत वा होऊ घातल्या आहेत त्याचा लाभ आपली कल्पकता, कर्तृत्वासह मिळविण्यावर एमबीए उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी भर द्यावा व त्याला विद्यापीठ व व्यवस्थापन शिक्षण संस्थांनी संपूर्ण पाठबळ द्यावे.
-दत्तात्रय आंबुलकर