ओनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा मुद्दा राज्यात चर्चेचा ठरला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारवर टीका करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं, ही प्रमुख मागणी केली होती. त्यानंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र झाल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पगार यासंदर्भात माहिती दिली आहे.
अनिल परब यांनी आजवरच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी पगारवाढ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सध्या एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करण्याची बाब ही हायकोर्टाच्या समितीसमोर असल्याने तो निर्णय तातडीने घेता येणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र, अंतरिम वाढ देण्याची घोषणा त्यांनी आज केली आहे. यासंदर्भातच माहिती देण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेला परिवहन मंत्री अनिल परब, गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत हे देखील हजर होते.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब यांनी म्हटलंय की, गेल्या दोन आठवड्यांपासून संप सुरु आहे. सध्या आम्ही कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. आज सरकारने मूळ पगारावर वाढ देण्याची मागणी मान्य केली आहे. जे कर्मचारी 1 वर्षे 10 वर्षे मध्ये आहेत, त्यांचे पाच हजार रुपये पगार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 ते 20 वर्षांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 20 वर्षे आणि त्याहून अधिक लोकांच्या पगारात 2 हजार पाचशे रुपयांनी केली आहे. इतर भत्ते देखील सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच मिळणार आहे. एसटीचे उत्पन्न वाढले तर कामगारांना प्रोत्साहन म्हणून इंसेंटिव्ह दिले जाईल. एसटीचा पगार यापुढे दहा तारखेच्या आत होईल याची हमी राज्यसरकाने घेतली आहे. एसटीच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी पगार वाढ असल्याचंही त्यांनी म्हटलंय.