अयोध्येत राम जन्मभूमि मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधानांसह विविध मान्यवरांचे बुधवारी आगमन होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून अयोध्यानगरीत सुरू असणारे धार्मिक विधी, भजन-कीर्तन, संगीत कार्यक्रम आनंदोत्सवी वातावरण बनवत आहे. युद्धपातळीवर कामाला लागलेल्या जिल्हा प्रशासनाच्या कार्यामुळे अयोध्येत एका इतिहासाच्या निर्मितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन हा भारताच्या इतिहासासाठी खरोखरच ऐतिहासिक असा क्षण ठरणार आहे. इतिहास काळापासून प्रभू श्रीराम मंदिरासाठी सुरू असणारी लढाई ही एका मशीद आणि मंदिराची न राहता अयोध्या आणि परिसरातील जातीय दंगलींचे अनेक वर्षे कारण बनली. ब्रिटिशकाळात त्याच्यावर इलाज करणे हुकूमशाही व्यवस्थेला शक्मय असताना त्यांनी त्या भागातील हिंदू मुस्लिमांमध्ये वाद कसा पेटत राहील आणि जातीय दंगली कशा घडत राहतील हेच पाहत भारताच्या इतिहासात एक गंभीर वळण निर्माण करून ठेवले. (किती त्यांची दूरदृष्टी आणि संपूर्ण भारतातील जनता आणि नेत्यांच्या वर्तनाची खात्री असेल?) राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद यांच्यातील वादाच्या या इतिहासाने ऐंशीचे दशक संपता संपता जे वळण घेतले त्यातून देशाने एक प्रचंड लोक आंदोलन पाहिले. प्रचंड मोठय़ा गर्दीने उद्ध्वस्त केलेली मशीद पाहिली, या मशिदीचा बदला म्हणून देशात बॉम्बस्फोटांची मालिका पाहिली, साखळी बॉम्बस्फोटांमध्ये होरपळणारी मुंबईसारखी आर्थिक राजधानी दीनवाणी झालेली पहिली. दोन धर्मामधल्या सर्वसामान्य नागरिकांचा रक्त संहार पहिला. त्याचे पडसाद पुढच्या दोन दशकांमध्ये देशभरात वेगवेगळय़ा ठिकाणी जातीय दंगलीत अनुभवले गेले. गोध्रा येथे करसेवकांच्या रेल्वे डब्याला आग लावून त्यांना त्यात होरपळून मारले गेले. त्याचा बदला म्हणून गुजरातमध्ये मोठी दंगल झाली. या दंगलीचेही पडसाद इतरत्र उमटले. अशाप्रकारे एका पवित्र प्रार्थना स्थळासाठी देशभरात हजारो माणसांचे रक्त सांडले आणि लाखो लोकांचे रक्त आटले. प्रकरण न्यायालयात जाऊन प्रभू श्रीराम व्यक्ती, देवता, महाकाव्य की दंतकथा इथपासून त्याच्या अस्तित्वापासून मंदिराच्या अस्तित्वापर्यंतची प्रत्येक गोष्ट पडताळली. आरोप आणि प्रत्यारोपित होत गेली. अशा पार्श्वभूमीवरील न्यायालयीन खटल्याचा निकाल ज्यांच्या समोर होता त्या न्यायासनाला हा वाद म्हणजे केवळ एक जमिनीच्या अधिकाराचा वाद आहे आणि तो त्यादृष्टीने पाहिला जावा असे सांगून निकाल द्यावे लागले. विविध न्यायपीठासमोर एक एक गुंता सोडवत सोडवत अखेर सर्वोच्च न्यायालयाने एक अंतिम निकाल दिला आणि राम मंदिराची वाट मोकळी झाली. मशिदीसाठीही स्वतंत्र पाच एकराची जागा देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आणि अखेर कोर्टाच्या हुकूमाने ही रक्तरंजित लढाई मंदिर निर्माणपर्यंत येऊन थांबली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते त्याची पायाभरणी व्हावी ही तर अपूर्वच घटना आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधण्याचे झालेले प्रयत्न तोकडे पडले. देशाला संगणक युगात घेऊन जाण्याचे स्वप्न बघणाऱया एका युवा नेतृत्वाला शरीयत कायदा, मंडल आणि कमंडलच्या जातीय आणि धार्मिक राजकारणात स्वतःला गुंतवून घेत देशालाही त्यात अडकून पडावे लागले. तमिळ वाघांच्या रोषास बळी पडून राजीव गांधी यांची अखेर झाली. मात्र देशातील प्रश्नाची अखेर होऊ शकली नाही. नरसिंहराव यांच्या काळातही सर्वपक्षीय तोडगा काढावा, सर्व धर्मियांना एका ठिकाणी बसवून चर्चा घडून प्रश्न मिटवला जावा यासाठीचे प्रयत्न, दोन्ही बाजूच्या हटवादी लोकांच्या राजकारणामुळे अपयशी ठरले. आणि अखेर त्यातून व्हायचे तेच झाले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीचा ढाचा असंख्य कार्यकर्त्यांनी पाडला. त्यापूर्वीपासूनच शरयू नदीच्या पात्रात पाण्यासारखे रक्त वाहिले होते. या रक्ताचा पाट देशाच्या कानाकोपऱयात पोहोचला. असो, त्या साऱयाच आता कटू आठवणी झाल्या आहेत. देशाच्या इतिहासाच्या पानातून या घटनांना कधीही बाजूला काढता येणार नाही. वेळोवेळी या घटना विविध कारणांनी भारतासारख्या देशाच्या डोक्मयावरच राहणार आणि त्याचे संदर्भही येत राहणार. पण फक्त हे संदर्भच तेवढे घेतले जावेत. रक्ताची गंगा पुन्हा कोणी त्या इतिहासाच्या पानातून वर्तमानाच्या रानात आणू नये. यासाठी आता होणारे राम मंदिर आणि अयोध्येतच दुसऱया ठिकाणी जागा मिळाल्यानंतर मशीद उभारली गेली तर त्यातून वाद मिटावा आणि संपूर्ण देशात एक संवादाचे वातावरण निर्माण व्हावे अशी अपेक्षा आहे. या लढय़ात योगदान दिलेल्या अनेक ज्ये÷ांना आणि पक्षांना विविध कारणांनी आयोजकांनी डावलण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून इतरांशी भांडता भांडता अखेरच्या क्षणी हे स्वकियांशीही भांडायला विसरले नाहीत असाच संदेश चर्चेत राहणार आहे. अर्थात आपल्या या निर्णयाला कसलाही मुलामा चढवला तरी त्याच्यावर आरोपांची पुटं ही वर्तमानातच चढणार आहेत. उमा भारती यांनी संपूर्ण सोहळय़ा दरम्यान कोरोनाचे कारण देऊन शरयूच्या काठावर बसू मात्र मंदिरात प्रवेश करणार नाही अशी भूमिका घेऊन आपला मनसुबा उघड केला आहेच! या सर्वांच्या पलीकडे मंदिर होते आहे याचा आनंद आणि राम जन्मभूमी मंदिराबाबतीत आस्था असणारा खूप मोठा वर्ग आहे. त्या आस्थेलाच निकालाचे कारण करुन न्यायालयाने वाद संपवला आहे. न्यायालयात संपलेला वाद आता लोकांच्या मनातूनही संपावा. फाळणी काळातील दु:खे एक पिढी स्वत:सोबत घेऊन गेली. पुढच्या पिढीने नवी कर्मभूमी फुलवली. तसेच आता नव्या पिढीने या मंदिर मशिदीच्या वादाला मागे टाकून नव्या जगात प्रवेश करावा. द्वेष कुठेतरी पुरून टाकावा आणि नवी वाटचाल सुरु करावी. त्यातच देशाचे हित आहे.
Previous Articleआष्ट्यात कोरोनाने घेतला माजी नगरसेवकाचा बळी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.