पहिल्या टप्यात 10 शाळांमध्ये जिल्हय़ातील तीन शाळांचा समावेश
प्रतिनिधी/ सातारा
मागील अनेक वर्षापासुन दुर्लक्षित असणाऱया व ऐतिहासिक असे महत्व असणाऱया शहरातील प्रतापसिंह हायस्कुलची दखल मंत्रालयाकडुन ही घेतली आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असल्याने ज्या ज्या महापुरूषांनी देश उभारणीत बहुमोल योगदान दिले त्यांच्या जन्मगावच्या शाळांचा विकास करण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. याअंतर्गत राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात पहिल्या टप्यात राज्यातील 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हय़ातील तीन शाळांचा समावेश करण्यात आला असुन यामध्ये नायगावच्या (ता. खंडाळा) सावित्रीबाई फुले शाळा व कटगुण (ता. खटाव) येथील शाळेचा समावेश आहे.
सामाजिक सलोखा, लोकशाही अन मानवतावाद या मूलमंत्रा सोबतच देशाच्या स्वातंत्र्यात योगदान असलेल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या महापुरुषांच्या जन्मगावांचा या प्रस्तावात समावेश आहे. या महापुरुषांच्या जन्मगावच्या शाळा आधुनिक होतील. सुसज्ज इमारती असतील. या महापुरूषांचा इतिहास आणि विचार सांगणारे संग्रहालय असेल, असा या उपक्रमामागचा हेतू आहे. या सर्व शाळा ऐतिहासिक असल्याने भविष्यातील नव्या पिढीसमोर आपापल्या गावातील महापुरुषांचा आदर्श समोर उभा राहून राष्ट्राच्या उभारणीत योगदान देणारे प्रोत्साहन मिळावे यासाठी या शाळांचा विकास करण्यात येणार आहे. ही संकल्पना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची आहे. प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मान्यता दिली आहे.
मंत्रालयाकडुन शिक्षण विभागाला पत्र येताच नुकतेच शिक्षण विभागाच्या अभियंतांनी या शाळांना भेट देऊन पहाणी केली. तसेच शाळा विकसित करण्याकरीता लागणाऱया निधीच्या माहितीचा अहवाल ही पाठविण्यात आला आहे. आता लवकरच येत्या काही दिवसात या ऐतिहासिक अशा शाळांचा कायापालट होणार हे नक्की.
प्रतासिंह हायस्कुल, सातारा
प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी 1824 मध्ये ही शाळा स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1904 रोजी या शाळेत प्रवेश घेतला होता. या शाळेत डॉ. बी. आर आंबेडकरांच्या हस्ताक्षराची सही अद्याप ही या शाळेत उपलब्ध आहे. या शाळेतील शिक्षक आंबेडकर यांनी बाबासाहेबांना आपले आडनाव लावले होते. तसेच अनेक मान्यवरांनी या शाळेत शिक्षण घेऊन देशाच्या शिरपेचात आपले नाव कोरले आहे.
नायगाव शाळा (ता. खटाव)
सावित्री बाई फुलेंचे नायगाव हे जन्मगाव असून, त्यांनी मुलींच्या शिक्षणाकरीता खूप मोठ्ठा लढा उभा केला. यादरम्यान त्यांना अनेक संकटांना व आव्हानांना ही सामोरे जावे लागले होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आज मुलींना अभिमानाने शिक्षणक्षेत्रात भरारी घेता येत आहे.
खटाव तालुक्यातील कटगुण
कटगुण हे ज्योतिराव फुले यांचे जन्मगाव आहे. ज्योतिराव फुलेंनी ही शिक्षणाचा पाया रोवला गेला आहे. 1848 साली त्यांनी पुण्यात भिडे वाडा येथे पहिली शाळा उभी केली. तसेच त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाबाबतची गोडी निर्माण करून त्यांना ही शिक्षित केले.
प्रतापसिंह हायस्कूलचा पट 150 वर
प्रतापसिंह हायस्कुलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांनी या शाळेत अनेक बदल केले आहेत. यामध्ये शाळेच्या अनुषंगाने मुलांचा पट वाढविणे, मुलांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल याकरीता प्रयत्न केले. यंदा या शाळेचा पटही वाढला असुन एकुण 150 इतका पट झाला आहे.