प्रतिनिधी/ वाई
सिक्कीममध्ये कार्य बजावत असणाऱया ओझर्डे (ता. वाई) येथील सोमनाथ अरविंद तांगडे (वय 38) या जवानाला वीरमरण आले. नेमणुकीस असणाऱया ठिकाणावरील बर्फाच्या डोंगराळ भागातील तंबू वादळी वारा व पावसाने उडून गेल्याने जवान सोमनाथ तांगडे जखमी झाले होते. त्यांचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हुतात्मा तांगडे यांच्या निधनामुळे परिसरात शोक व्यक्त होत असून त्यांच्या पार्थिवाची ग्रामस्थांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ओझर्डे (ता. वाई) येथील सोमनाथ अरविंद तांगडे (वय 38) हा तरुण मिल्ट्रीमधील सिग्नल या डिपार्टमेंटमध्ये हवालदार या पदावर सिक्कीम येथील कॉलिंग पॉंग येथील 10 किलोमिटरवर बर्फाच्या टेकडीवर इतर दोघांबरोबर नेमणुकीस होता. दि. 8 रोजी बर्फाच्या डोंगराळ भागाला वादळी वारा व पावसाने रात्री 3 वाजण्याच्या सुमारास झोडपून काढले. त्यात त्यांचे तंबू उडुन गेले. त्यामुळे रात्रभर हे तिघेही भिषण थंडीत कुडकुडत बसले. त्यावेळी ओझर्डे येथील रहिवासी असलेले जवान सोमनाथ अरविंद तांगडे हे चक्कर येऊन तेथील बर्फावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कॉलींग पॉंग येथील बॅरेकपुर येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली. पण तेव्हापासून ते कोमात गेले. दि 16 रोजी सकाळी 7 वाजता त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला आहे.
जवान सोमनाथ तांगडे यांचे पार्थिव सिक्कीमवरुन विमानाने पुण्यापर्यंत आणण्यासाठी ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रेश्मा, मुलगी सिद्धी (वय 12 वर्ष), परी (वय 8 वर्ष) असे आहेत.
हुतात्मा सोमनाथचा पार्थीव लवकर मिळण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यामार्फत ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या या अकस्मित जाण्याने ओझर्डे गावासह वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, किसन वीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांनी केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांना वैयक्तिक पत्र पाठवुन या हुतात्मा जवानाचे पार्थिव सिक्किमवरुन त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी पत्र पाठवुन विनंती केली असून त्यानुसार गडकरी यांच्या कार्यालयातुन सदर बाबीचा पाठपुरावा सुरु झाला आहे.