सायबर पोलिसांची सावधगिरी बाळगण्याची सूचना
प्रतिनिधी /पणजी
मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर कुणालाही देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. राज्यात दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढत असून त्यासाठी आपणच जबाबदार असतो, कोणतेही आमीष दाखविले की आपण सरळ त्यांना मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर देत असतो, त्यामुळेच गुन्हेगारांना सर्व माहिती मिळते आणि त्यातूनच आपली फसवणूक होत असते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना सावधगिरीने वागणे अती गरजेचे आहे, असेही पोलिसांनी सूचविले आहे.
देशभरात तसेच गोव्यातही 5जी इंटरनेट सुविधा सुरु झाली आहे. ही सुविधा देण्याचे आमीष दाखवून गुन्हेगार फोन करतात आणि 4 जी असलेले सिमकार्ड 5जी करण्यासाठी आपल्या मोबाईवर ओटीपी येणार तो पुन्हा ज्या नंबरवरून फोन आला त्या नंबरवर पाठवा, असे आवाहन करतात. आपले सिमकार्ड 5जी करण्यासाठी आपण ओटीपी पाठवतो आणि आपली फसवणूक होते.
ओटीपी गुन्हेगारांना मिळल्यानंतर त्यांना तुमची सर्व माहिती मिळते, इतकेच नव्हे तर तुमच्या बँक खात्याचीही माहिती मिळते आणि अवघ्या काही मिनिटांतच बँक खात्यातील सर्व पैसे गायब होतात. गुन्हा झाल्यानंतर त्याचा शोध लावणे कठीण असते. त्यामुळे गुन्हा होणारच नाही याची प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे, असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.