प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजावर अन्याय झालेला असून ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत त्वरित केंद्र व राज्य शासनाने लक्ष घालून ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शनिवारी ओबीसी समाजाच्या संघटनांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱयांकडे केली.
या निवेदनात स्वायत्त संस्थांमधील निवडणुकांचे आरक्षण, शासकीय कंपन्या, बँका, नोकरी, शिक्षण यामधील आरक्षण पूर्ववत करावे तसेच मंत्रिगट समितीच्या 2006 च्या शिफारशीप्रमाणे ओबीसींना पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करावे व ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासाठी तात्काळ आयोग नेमावा, अशा अनेक मागण्या निवेदनातून देण्यात आल्या.
यावेळी भंडारी समाज जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्राr, कुंभार समाज अध्यक्ष पाटकर, विलास गुडेकर, गोसावी समाज अध्यक्ष संदीप गोसावी, नाभिक समाज अध्यक्ष अनिल अणावकर, भंडारी समाज सचिव राजू गवंडे, ठाकर समाजाचे समीर ठाकुर, अमित ठाकुर, लक्ष्मण घोटकर, देविदास पवार, शिंपी समाजाचे विलास महाडिक, अभिजित मेस्त्राr आदी उपस्थित होते.