कर्नाटकपाठोपाठ गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने देशातील रुग्णसंख्या आता तीनवर पोहोचली आहे. त्याचबरोबर मुंबई, दिल्लीसह राज्याच्या अनेक भागांत ओमिक्रॉनसदृश लक्षण असलेल्या संशयितांचाही आकडा वाढल्याने पुढच्या काही दिवसांत या आजाराचे रुग्ण वाढण्याची भीती आहे. हे पाहता आगामी काळात सर्वांनाच अधिकची काळजी घ्यावी लागेल. मागील दीड ते दोन वर्षांपासून भारतासह अवघे जग कोरोनाशी सामना करीत आहे. देशाला आत्तापर्यंत दोन लाटांना सामोरे जावे लागले असून, या काळात लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जुलैनंतर लाट ओसरल्यापासून मात्र भारतीय नागरिक मोकळा श्वास घेताना दिसतात. किंबहुना ओमिक्रॉनच्या आगमनाने पुन्हा जनमानस धास्तावल्याचे पहायला मिळते. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा हा नवा विषाणू सापडला असून, त्याची तीव्रता ‘डेल्टा’पेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. दक्षिण आफ्रिकेत दहा दिवसांत रुग्णसंख्या दहा पट होत असेल, तर ओमिक्रॉनच्या संसर्गाचा झपाटा हा सुपरफास्ट आहे, असेच म्हणता येईल. एकटय़ा दक्षिण आफ्रिकेतील रुग्णवाढ ही 350 ते 400 टक्के इतकी असून, नामिबिया, झिम्बाब्वे, सुदान, मोझाम्बिक या आफ्रिका खंडातील देशांमध्येही विक्रमी रुग्णसंख्या असल्याचे आकडेवारी सांगते. याशिवाय अन्य खंडांमधील देशांसह जवळपास 33 राष्ट्रांमध्ये या विषाणूने हातपाय पसरले असून, हा धोका नजिकच्या काळात आणखी वाढण्याचा धोका संभवतो. अर्थात रुग्णसंख्या वाढत असली, तरी आफ्रिकेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे अल्प असणे, हे दिलासादायक ठरते. मात्र, कोरोना बळींची संख्या मर्यादित असली, तरी जगाला गाफील राहून चालणार नाही. मास्कचा वापरण करणे, फिजिकल डिस्टन्सिंग राखणे, अनावश्यक प्रवास टाळणे, स्वच्छता राखणे यांसह विविध नियमांचे पालन हे प्रत्येकाला करावेच लागेल. त्याचबरोबर आजार अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे शहाणपणाचे ठरेल. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानंतर भारतात अनेक क्षेत्रे खुली करण्यात आली खरी. मात्र, नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही नागरिक मास्कचा वापरच करत नसल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळते. अशा नियम मोडणाऱया मुक्त नागरिकांवर कायद्याचा बडगा दाखविल्याशिवाय पर्याय नाही. मास्कच्या वापराने स्वतःचा व इतरांचा बचाव करणे शक्य होते, हे सिद्ध झाले आहे. हे बघता ही सामाजिक जबाबदारी वा कर्तव्य समजून याचे प्रत्येकाने पालन करावे. त्यातूनच या आजाराचा संसर्ग आपल्याला आटोक्यात ठेवता येईल. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी तूर्तास लॉकडाउनची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हाही दिलासाच. लॉकडाउनमध्ये सर्व क्षेत्रे कशी आपुंचित होतात, त्यातून रोजगारासह एकूणच पोटापाण्याचा नि पर्यायाने जगण्याचाच प्रश्न कसा निर्माण होतो, हे सर्वांनीच अनुभवले आहे. त्यामुळे ही वेळच येऊ नये, याकरिता सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे. केंद्र व राज्य सरकारनेही ओमिक्रॉनच्या मुकाबल्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधांसह सर्व प्रकारच्या यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. आता चाळीस आणि त्यापुढील वयाच्या लोकांना कोरोना लशीचा बूस्टर डोस देण्याची शिफारस देशातील वरिष्ठ शास्त्रज्ञांकडून करण्यात आली आहे. अधिक धोका व जोखीम असलेल्यांना याकरिता प्राधान्य देण्यात यावे, असा सल्लाही या माध्यमातून देण्यात आला असून, शास्त्रीय सल्ल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. कोरोनावरील सहा बूस्टर डोस सुरक्षित आहेत, असे ‘दि लॅन्सेट’ या नियतकालिकाचा अभ्यास सांगतो. त्यामुळे बूस्टर डोसचाही विचार करण्यास हरकत नसावी. कोव्हॅक्सिन ही भारतीय लस संपूर्ण संसर्गालाच निक्रिय करते. त्यामुळे ती नव्या व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या लशीच्या परिणामकारकतेचा अभ्यास राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत सुरू असून, त्याचे निष्कर्षही लवकरच अपेक्षित आहेत. कोव्हॅक्सिन प्रभावी असल्याच्या आयसीएमआरच्या संशोधकांच्या दाव्यास पुष्टी मिळाली, तर ती निश्चितच मोठी उपलब्धी असेल. ओमिक्रॉनची लक्षणे तीव्र स्वरुपाची नसून, सर्वसाधारण आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचीही गरज भासत नसल्याकडे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे लक्ष वेधतात. त्यामुळे घाबरून जाण्याचेही कारण नाही. मात्र, प्रत्येकाने स्वतची काळजी घेतली, तर पुढचे काम सोपे होईल. 130 कोटी लोकसंख्येच्या भारतातील 46 कोटी लोकांनी आत्तापर्यंत दोन्ही डोस घेतले आहेत. हे प्रमाण 32 टक्के इतके असल्याचे दिसून येते. दुसऱया बाजूला पहिला डोस 79 कोटी लोकांनी घेतला असून, 12 कोटी लोकांनी दुसरा डोसच घेतला नसल्याची माहिती पुढे आली आहे. हे चिंताजनकच. ज्यांनी लशीचा एकही डोस घेतलेला नाही, त्यांना स्वाभाविकच संसर्गाचा सर्वाधिक धोका असेल. त्यामुळे पहिला व दुसरा डोस घेण्याच्या दृष्टीने नागरिकांनी टाळाटाळ करता कामा नये. उलट ते तातडीने घ्यावेत. जेणेकरून पुढच्या टप्प्यात बूस्टर डोसचा निर्णय झाला, तर त्याकरिता सज्ज राहता येईल. लोकांना ओमिक्रॉनेकेंद्रित बूस्टर डोस द्यायची वेळ आलीच, तर कंपनीकडे पुरेसा साठा असून, तो पूर्वीच्याच किमतीला उपलब्ध करून दिला जाईल, असे सीरम संस्थेच्या अदर पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे. हे नक्कीच सकारात्मक म्हणता येईल. अनंत अडचणींवर मात करीत कोरोनाच्या पहिल्या व दुसऱया लाटेला आपण परतवू शकलो. आता ओमिक्रॉनचे संकट उंबरठय़ावर आहे. त्याला थोपविण्यासाठी अन्य उपायांखेरीज काटेकोर तपासणी, विलगीकरण याकडेही लक्ष द्यावे लागेल. जिनोम सिक्वेन्सिंगचा वेग वाढविण्यासाठीही पावले उचलावी लागतील. एकजुटीतून हे आव्हानही आपण मोडून काढू, हे निश्चित.
Previous Articleदेशात 50 टक्के लाभार्थींचे लसीकरण पूर्ण
Next Article ‘पुष्पा’चा ट्रेलर प्रदर्शित
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.