ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेल्या सुमारे दोन वर्षापासून कोरोना संसर्गाने संपूर्ण जगभरात चिंतेचं वातावरण आहे. कारण कोरोना संसर्गाने मानवी समुदायावर मोठ्या प्रमाणात परिणाम केला आहे. मानवी जीवन सर्वांगाने ढवळून निघाले आहे. मोठ्या प्रमाणात जीवित आणि अर्थिक हाणी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात ही मोठ्या प्रमाणात नागरिकांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. देशात लाखो नागरिकांना आपले जीव गमवावे लागले.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील या संकटाचा परिणाम झाला. कोरोना निर्बंध काळात ठप्प झालेलं मानवी जिवन यामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था परिणामत: नागरीकांची विस्कटत चाललेली अर्थिक घडी असे चित्रं आहे. याच पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट येणार का ? यावर युक्त राष्ट्रांनी भाष्य करत आता पुन्हा एकदा ओमिक्रॉनमुळे तेच संकट भारतावर येऊ शकतं, अशी भिती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.
कोरोना लाटेमध्ये बसलेला आर्थिक फटका भरून काढण्याचा भारताचा प्रयत्न डेल्टा व्हेरिएंटमुळे अडचणीत आला. त्यानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था काहीशी सावरू लागल्याचं चित्र निर्माण झालेलं असतानाच आता ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचं संकट भारतासमोर उभं ठाकलं आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने यासंदर्भात भारताला इशारा दिला आहे. दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा वेग चांगला असल्याचं देखील संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीनं नमूद केलं आहे. “वेगाने होणारं लसीकरण, सौम्य निर्बंध आणि त्याला अनुसरून अर्थविषयक धोरण यामुळे भारताचा जीडीपी ६.७ टक्क्यांनी वाढू शकतो”, असं यात नमूद करण्यात आलं आहे.