श्रीनगर येथील गो-शाळेच्या आवारात प्रकल्पाची पाहणी : दररोज 100 किलो कचऱयापासून खत तयार होणार
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पण कचऱयाची समस्या जैसे थे आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेने स्वतःचा ओल्या कचऱयापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. श्रीनगर येथील गो-शाळेच्या आवारात या प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. त्यामुळे दररोज 100 किलो कचऱयापासून खत तयार होणार आहे.
शहर आणि उपनगरात दररोज 250 हून अधिक टन कचरा जमा होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी विघटन करण्यात येते. तसेच तुरमुरी कचरा डेपो येथे सर्व कचऱयाचा साठा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येते. व त्यापासून खत उत्पादन करण्यात येत आहे. दररोज 120 टन कचऱयावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी रॅम्के कंपनीवर सोपविण्यात आली होती. 25 वर्षांच्या कराराने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेकडे जमा झालेला कचरा रॅम्के कंपनीला द्यावा लागत आहे. पण सध्या कचरा विघटन कायद्यामध्ये बरेच बदल करण्यात आले. बदललेल्या नियमावलीनुसार व कायद्यानुसार कचऱयावर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेत वाढ करण्याची सूचना रॅम्के कंपनीला करण्यात आली आहे. अद्याप हे काम सुरू आहे. मात्र सध्या शहरात जमा होणाऱया कचऱयाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कचऱयापासून वीज निर्मितीचा प्रकल्प किंवा अन्य प्रकल्प राबविण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे. कचऱयाची उचल घरोघरी जाऊन करण्यात येते. तसेच ओला आणि सुका असे कचऱयाचे विघटन करून जमा करण्यात येत आहे. कचऱयामध्ये जमा होणाऱया प्लास्टिक पिशव्या व पुनर्रवापराचे साहित्य जमा करून सिमेंट कंपनीला देण्यात येत आहे. तसेच ओल्या कचऱयापासून तुरमुरी येथे खत निर्मिती करण्यात येते.
4 लाख 40 हजाराचे उपकरण खरेदी
वाढत्या शहरीकरणामुळे कचऱयाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे कचऱयावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प अपुरा पडू लागला आहे. शहरात साचणारे कचऱयाचे ढिगारे मनपाची डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि कचऱयापासून वीज निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच कचऱयापासून खत निर्मितीचा प्रकल्पदेखील सुरू करण्यात आला आहे. श्रीनगर येथील गो-शाळेच्या आवारात खत निर्मितीच्या प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. खत निर्मितीकरिता महानगरपालिकेने 4 लाख 40 हजार रुपयाचे उपकरण खरेदी केले आहे. भाजीपाला तसेच अन्य ओला कचरा मशिनमध्ये घातल्यास त्याचा चुरा तयार होतो. तो चुरा खत म्हणून वापरता येतो. दररोज 100 किलो कचरा मशिनमध्ये घालून तो चुरा बनविल्यानंतर साठवून ठेवल्यास त्याचे खतामध्ये रुपांतर होते. किंवा हा चुरा झाडे आणि शेतीमध्ये घातल्यास कुजून खत निर्माण होते. कचऱयाचा चुरा झाल्यानंतर कुजण्याची प्रक्रिया जलदगतीने होते. त्यामुळेच कचऱयाचा चुरा करून त्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. विविध भागात ओला कचरा जमा करून त्या परिसरात असलेल्या मनपाच्या जागेत ही यंत्रणा सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेचा आहे. सध्या श्रीनगर येथील गो-शाळेच्या इमारतीत प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कमी जागेत कचरा तसेच मशीन ठेवता येवू शकते. यंत्रणेचा आकार 8 फूट लांब आणि 5 फूट उंच असून यंत्रणेमध्ये कचरा घालण्यासाठी दोन कामगारांची आवश्यकता आहे. जमा झालेला कचरा यंत्राच्या वरील भागातून घातल्यास त्याचा बारीक चुरा तयार होतो त्यापासून खत निर्माण होते.
महापालिकेचे पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या पर्यावरण साहाय्यक अभियंत्या महादेवी यांनी शुक्रवारी प्रकल्पाची चाचणी केली. दररोज जमा होणारा ओला कचरा या मशिनमध्ये घातल्यास त्यापासून चुरा होऊन खत होऊ शकते. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.