घनःशाम मोरे / भिलवडी
महापुराचे महाभयानक संकट येऊनही सदानंद साहित्य संमेलनाचे सातत्य ठेवणे ही पेरणी पुढच्या पिढीसाठी प्रेरणादाई ठरेल, असे प्रतिपादन औदुंबर-अंकलखोप(ता. पलूस) येथील सदानंद साहित्य मंडळाच्या 77 व्या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन विख्यात कवी प्रा. इंद्रजित भालेराव (परभणी) यांनी केले.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष शहाजी बळवंत सूर्यवंशी, कवी संमेलनाचे अध्यक्ष सुधाकर इनामदार (आटपाडी), प्रमुख नेते घनःशाम सूर्यवंशी, सरपंच अनिल विभुते, उपसरपंच सौ. सुनिता चौगुले, सत्यविजय बँकेचे आप्पासाहेब पवार, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांची उपस्थिती होती.
यावेळी भालेराव म्हणाले, संक्रमण हा सृष्टीचा नियम आहे आणि औदुंबर हे सृष्टीचं लाडकं, लसलसतं बाळ आहे. त्यामुळे कुस बदलणं हा त्यांच्यासाठी लडिवाळ खेळ सुरू आहे. म्हणून सृष्टीलाही त्यांच कौतुक आहे. सृष्टी सगळं काही औदुंबरला भरभरून देते सुख आणि दुःखही. सदानंद सामंत, कवि सुधांशू, म. भा. भोसले या मंडळींनी साहित्यातून हे संक्रमण पकडलं आणि औदुंबरचे साहित्य संमेलन हे व्यासपीठ निर्माण केले. भक्तांमध्ये जशी दत्ताची ओढ तशीच ओढ साहित्यिकात या व्यासपीठाने निर्माण केली. साहित्याची निखळ निष्ठा म्हणजे काय याचा आदर्श या संमेलनाने निर्माण केला. ज्यांनी औदुंबरचे संमेलन सुरू केले. ती माणसं आणि त्यांचा काळ सश्रद्ध होता. आज अश्रद्धा वाढली आहे. अश्रद्धा आणि अंधश्रद्धा तितक्याच भयंकर. त्यामुळे आज जगात हिंसा वाढली आहे. म्हणून श्रद्धा महत्वाची ती संपली की माणसाचा प्रवास मरणाकडे सुरू होतो. कारण अश्रद्ध माणसाची जगण्यावर श्रद्धा संपते. आज समाजात शेतकरी वगळून जे आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे ते अश्रद्धेमुळेच.
साहित्यात आज बजबजपुरी वाढली आहे. त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा ज्ञानेश्वर, तुकाराम, प्रेमचंद, विवेकानंद, कबीर, विनोबा, पंजाबी कवी पाश, रविंद्रनाथ टागोर यांच्या लेखनाच्या सहवासात रहायला आवडतं. यशवंतराव चव्हाण हे कवि सुधांशुचे मित्र. असा प्रगल्भ व्यक्तीमत्वाचा राजकारणीही युगायुगातून घडणारी गोष्ट आहे. तुम्ही वाडःमय विश्वात उतरलात की लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडं, आपल्या विचाराकडं, आपल्या गटाकडं ओढतात. तुमचा काही उपयोग होतो का ते पाहतात. तुम्ही त्यांच्या उपयोगी पडत नसाल तर ते तुमचे शत्रुही होतात. आपण वाचत, लिहित राहावं. सुरूवातीला प्रतिसादाची असणारी आस नंतर रहात नाही लिहिण्यातलं सुख मिळत राहतं, प्रसिद्धीचीही घाई नसते. ही अवस्था सर्वात उत्तम.
आपण कविता लिहायला सुरुवात करतो, तेव्हा एखाद्या कविच्या प्रभावात असतो. कुणीतरी आपल्याला प्रेरणादायी वाटत असतं. नंतर व्यक्तीचा आदर्श धुसर होत जातो. नंतर एखाद्या विचारांच्या प्रभावाखाली जास्त असतो. आपणाला वाटत रहात जग समजून घेण्याचा हाच दृष्टीकोन योग्य आहे. पुष्कळ दिवस हा प्रभाव टिकतो. पण जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो, स्वतःची दृष्टी फुलते, तेव्हा हे रेडीमेड दृष्टिकोन अपुरे वाटायला लागतात. सगळ्या जगण्याचा अनुभव अशा एखाद्या दृष्टिकोनातून लावणे हा बावळटपणा वाटायला लागतो. आपण हे चष्मे काढून ठेवतो आणि आपल्याला स्वतंत्र जग पहायला मिळते. याच सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेविरुद्धही तो अनेकदा जातो. आपल्याच भुमिकेविषयी शंका उपस्थित करायला लागतो. मग त्या शंका दुर करून तो मूळ भुमिकेलाच दुरुस्त करतो. त्याची भुमिकाच त्यामुळे अधिक समृद्ध व्हायला लागते. म्हणूनच तुकाराम हा कालातीत कवि ठरायला लागतो. मुळ खुंटा न सोडता आपला दोर लांबवत राहाणं हे खऱया कवितेचं खरं काम असत.
इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या मार्मिक कवितेतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत काही कविता ऐकवल्या. यामध्ये (बाप) शेतामध्ये माझी खोप तिथे बोराटीचे झाड, तिथे राबतो कष्ट करीतो शेतकरी माझा बाप, (माझ्या गावाकडे चल दोस्ता) काटयाकुटयाचा तुडवीत रस्ता माझ्या गावकडे चल माझ्या दोस्ता, (शिक बाबा शिक) शिक बाबा शिक लढाईला शिक कुणब्याच्या पोरा आता लढाईला शिक.
या साहित्य संमेलनाचे नियोजन पुरुषोत्तम जोशी, सुभाष कवडे यांच्यासह सदानंद साहित्य मंडळातील सर्व पदाधिकारी व अंकलखोप ग्रामपंचायत प्रशासनाच्या संयुक्त विदयमाने करण्यात आले होते.
यावेळी सौ. वैशाली मोहनराव पाटील यांच्या सांजवात या कविता संग्रहाचे प्रकाशन तर पद्मश्री प्रा. डॉ. सुभाषचंद्रजी जसा भाटी यांच्या श्री संत सेना महाराज चरित्र व अभंगवाणी या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.