भू-धारकांचा इशारा : नव्या प्रमाणेच किंमत हवी
प्रतिनिधी/ संकेश्वर
कणगले-तवंदी गावच्या हद्दीत कर्नाटक सरकारकडून प्रदेश औद्यौगिक वसाहत निर्माण करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. मात्र एकूण जमिनीपैकी राष्ट्रीय महामार्गाच्यानजीक असणाऱया 20 एकर बागायत जमिनीच्या मालकांनी कर्नाटक प्रदेश औद्यौगिक विकास प्राधीकरणाकडे तक्रार दाखल केली आहे. प्राधिकरणाने तक्रारीवर अद्यापही चर्चा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱयांनी औद्यौगिक निर्माणचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उजाळा मिळाला आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून शासनाने ताब्यात घेतलेल्या एकून्ण 818 एकर जमिनीवर कर्नाटक प्रदेश औद्यौगिक विकास प्राधिकरणाने औद्यौगिक वसाहत निर्माण करण्यासाठी मंजुरी घेतली आहे. पण तांत्रिक मंजुरीच्या घोळात तब्बल दहा वर्षे हे काम रखडले होते. प्राधिकरणाने भू-धारकांना जिरायत जमिनीसाठी एकरी 17 लाख 25 हजाराप्रमाणे किंमत दिली आहे. तर बागायत जमिनीसाठी एकरी 18 लाख 25 हजार रुपयाप्रमाणे किंमत देऊ केली आहे. याठिकाणी बागायत जमिनीचे एकूण क्षेत्रफळ 20 एकर आहे.
बागायत जमीन मालकांनी प्रारंभापासूनच आपल्या जमिनीला नव्या नियमानुसार किंमत मिळावी, अशी मागणी केली आहे. पण प्राधिकरण शेतकऱयांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत दोन वर्षापासून युद्धपातळीवर औद्योगिक वसाहत निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहे. प्राधिकरणाच्या या निष्काळपणाचा तीव्र निषेध करीत बुधवारी 28 रोजी औद्योगिक निर्माणचे काम बंद पाडण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे. जोपर्यंत आमच्या मागणीचा विचार होत नाही. तोपर्यंत काम चालू देणार नाही, असा पावित्रा शेतकऱयांनी घेतला आहे.
आपल्याकडे असणारी एकमेव इतकीच बागायत जमीन आहे. वर्षाकाठी या जमिनीतून लाखोचे उत्पादन घेतो. पण राज्य सरकारच्या धोरणात अडचणी निर्माण करावयाच्या नाहीत यासाठी शासनाने ताब्यात घेतलेल्या जमिनीना आम्ही विरोध केला नाही. पण या जमिनी आमच्या हातून गेल्यानंतर आपल्याडे जमिनीचा एकही तुकडा पिकवण्यासाठी शिल्लक राहणार नाही. तेंव्हा बिगरपिकाच्या जमिनीचाच दर आम्हाला मिळत असेल तो आमच्यावर अन्याय करणारा आहे. तेंव्हा आमच्या बागायत 20 एकर जमिनीला नव्या नियमानुसार किंमत मिळावी, अन्यथा आमच्या जमिनी आम्हाला परत करा, अशी मागणी जमीन मालक शशिकांत एस. शिरगांवे, बी. आर. मुरगुडे, ईश्वर पी. माळी, सदाशिव डी. शिरगांवे, सदाशिव आर. शिरगांवे, सुरेश एम. माळी व मोहनलाल शहा यांनी केली आहे.