ऑनलाईन टीम/तरुण भारत
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांच्यात झालेल्या भेटीनंतर एमआयएम महाविकास आघाडी सोबत येण्याची चर्चा सुरु झाली आहे. तशी ऑफरही खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यात भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत एमआयएम पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरीपुढे जुकणाऱ्यांसोबत युती होऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री नेते राजेश टोपे यांच्या भेट झाली. या पार्श्वभूमीवर एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊन लढण्याची ऑफर दिली आहे. एक खासदार, २९ नगरसेवक, दोन आमदार असलेल्या एमआयएमची राष्ट्रवादीला असलेली ऑफर सध्या चर्चेत आली आहे. तसेच इम्तियाज जलील आणि राजेश टोपे यांच्यात झालेल्या भेटीनंतर ही चर्चा सुरु झाली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना एमआयएमसोबत उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे.
“महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तेच राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडला? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे, हे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळे या अफवा आहेत.” असे संजय राऊत म्हणाले