ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘Y’ श्रेणीतील सुरक्षा पुरविण्यात आली आहे. कंगनाने याबद्दल ट्विट करून गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.
कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. मी अमित शाह यांची आभारी आहे. सध्याची परिस्थिती पाहता ते मला काही दिवसांनी मुंबईत येण्याचा सल्ला देऊ शकत होते. मात्र, त्यांनी भारताच्या मुलीने दिलेल्या वचनांचा मान ठेवला. माझ्या स्वाभिमान आणि आत्मसम्मनाची लाज राखली.’
काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाले. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. संजय राऊतांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला होता. यावर कंगनाने हे चॅलेंज स्विकारून मी 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे, हिम्मत असेल तर अडवून दाखवा असे, म्हटले होते.
त्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारने कंगनाला सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला असतानाच मोदी सरकारकडून तिला ‘Y’ श्रेणीतील सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.