कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी मुख्यमंत्री करणार तज्ञांशी चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी सोमवार दि. 16 ऑगस्टपासून राज्याच्या सीमेवरील जिल्हय़ांमध्ये आणखी कठोर निर्बंध घालण्यात येण्याची शक्यता आहे. बेंगळुरातही संसर्ग वाढत असून त्यासंबंधी ठोस उपाय करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी बेंगळूरमध्ये तज्ञांची तातडीची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
जागतिक अवयवदान दिनानिमित्त उडुपी येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जारी करण्यात येणाऱया कठोर निर्बंधांबाबत आपण आताच बोलणार नाही. तज्ञांच्या सल्ल्यानुसारच सरकार पुढील निर्णय घेणार आहे. कोरोनाची अनेक मुलांना लागण होत आहे. 23 ऑगस्टपासून नववीपासूनचे पुढील वर्ग सुरू करण्यात येत आहेत. याविषयी देखील शनिवारी होणाऱया बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे ते म्हणाले.
केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढल्याने राज्याच्या सीमेवरील 8 जिल्हय़ांमध्ये विकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्यभरात रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत नाईट कर्फ्यू जारी आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर केरळ, महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील जिल्हय़ांमध्ये विकेंड कर्फ्यू सुरूच ठेवून नाईट कर्फ्यूच्या कालावधीत वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.
15 ऑगस्टनंतर राज्यात कठोर निर्बंध शक्य- आर. अशोक
कोरोनाची तिसरी लाट राज्याच्या उंबरठय़ावर आहे. याविषयी अवलोकन करून संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहे. यासाठी शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई तज्ञांशी चर्चा करणार आहेत. 15 ऑगस्टनंतर राज्यात कठोर मार्गसूची जारी होण्याची शक्यता आहे, असे महसूलमंत्री आर. अशोक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.