14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन, सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात धान्यपुरवठा सुरळीत करण्यासाठी 374 ट्रक भरून माल गोव्यात आणण्यात आला आहे. राज्यातील 90 टक्के दुकाने व घाऊक विक्रेत्यांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. सरकारने जाहीर केलेले लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत कायम असून लोकांनी संयम पाळावा तसेच सामाजिक अंतर कायम राखावे असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केले. 8000 खलाशांबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले असून केंद्र सरकारला विनंती करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात लॉकडाऊन असतानाही लोक रस्त्यावर फिरत आहेत. आपत्कालीन सेवा पुरविण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. लोकांना रस्त्यावर फिरण्यासाठी नव्हे. लोकांनी अशाप्रकारे लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई करणे भाग पडेल. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. जनतेने संयम पाळावा. आजपर्यंत राज्यात 5 कोरोना रुग्ण सापडले आहेत. ज्या संशयित रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत आहेत त्यांचा अहवाल आलेला नाही. पुणे येथे 48 नमुने पाठविले आहेत. तर गोव्यात 7 नमुने आहेत. या सर्व नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला. तर गोवा सुरक्षित झोनमध्ये राहील. त्यामुळे जनतेने संयम पाळावा व सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कंपन्यांनी कामगारांना पूर्ण पगार द्यावा
मजूर आणि अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक सर्वत्र लक्ष ठेऊन आहेत. लॉकडाऊन काळात औद्योगिक कंपन्यांनी कामगारांना पूर्ण पगार द्यावा. कोणत्याही कंपनीने कामगारांचा पगार कमी केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
सरकारी कर्मचाऱयांना आज वेतन
सरकारी कर्मचाऱयांचा पगात आज 2 एप्रिल रोजी होणार आहे. बँकांमधून पैसे काढताना कर्मचाऱयांनी सामाजिक अंतर राखावे. त्याचबरोबर को ऑप. सोसायटीनीही सामाजिक दूरीबाबत काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, विधवा यांना विविध योजनांद्वारे मिळणारे पैसे पुढील 10 ते 15 दिवसात मिळतील. त्यासाठी केंद्र सरकारने 27500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत मिळणारा निधी 5 एप्रिलला दिला जाणार आहे. तर गृहआधार योजनेचा निधी 9 एप्रिलला दिला जाणार आहे.
जनधन खाते, तसेच विशेषता महिलांसाठी गरीब कल्याण योजनेंतर्गत दिला जाणारा 500 रुपयांचा निधी 3 महिन्यांचा एकाचवेळी दिला जाईल. 7500 नोंदणीकृत शेतकऱयांना मिळणारे 2000 रुपये तसेच विकलांगांना मिळणारे 1000 रुपये तीन महिन्यांचे एकदम देण्यात येतील.
विदेशी नागरिकांची पाठवणी
1200 विदेशी नागरिकांना पाठविण्यात आले आहे. पुढील 2 दिवसात आणखी 1000 जणांची पाठवणी करण्यात येईल. विशेष चार्टर विमानाने त्यांना पाठविण्यात येत आहे. जर्मन, रशिया व अन्य राष्ट्रातील हे नागरिक आहेत.
धान्यकोटा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध
धान्यकोटा उपलब्ध करण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. 374 धान्याचे ट्रक गोव्यात आले आहेत. कडधान्याचे वितरण सर्वत्र सुरू आहे. 90 टक्के दुकाने खुली झाली आहेत. पेडणे, डिचोली, धारबांदोडा, फोंडा, मुरगाव, पणजी आदी भागात दुकाने खुली आहेत. त्याचबरोबर कदंब महामंडळाच्या बसगाडय़ातूनही कडधान्य साठा उपलब्ध केला जात आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये व दक्षिण गोव्यातील काही भागात कडधान्ये वाहनातून पाठविली जात आहेत.
स्वस्त धान्य दुकाने आजपासून सुरू
सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाने आज 2 एप्रिलपासून सुरू होतील. त्याचबरोबर यावेळी स्वस्त धान्य दुकानातून अनुदानित स्वरुपात साखर देण्यात येणार आहे. लोकांनी स्वस्त धान्य दुकानात खरेदीसाठी जाताना सामाजिक दूरी बाळगावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अधिक कोटा साठवून ठेवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. कारण आता मुबलक प्रमाणात धान्य साठा उपलब्ध होणार आहे.
ऑनलाईन पास सेवा उपलब्ध
एका शहरातून दुसऱया शहरात औषधे खरेदी व अन्य महत्वाच्या खरेदीसाठी जाणाऱयांना आता सरकारने ऑनलाईन पास सेवा सुरू केली आहे. त्यामुळे घरी बसून ऑनलाईन तात्पुरते पास मिळविणे शक्य आहे. गोवा ऑनलाईन सर्वीसद्वारे हे पास उपलब्ध होणार आहेत.
2 ते 12 एप्रिलपर्यंत सेनिटायझेशन ड्राईव्ह
गोवा सरकार 2 ते 12 एप्रिलपर्यंत सेनिटायझेशन ड्राईव्ह सुरू करणार आहे. वाहतूक खाते, पंचायत, कदंब महामंडळ, साबांखा व अन्य खात्यांच्या शौचालय व अन्य परिसरात सेनिटायझेशन ड्राईव्ह होणार आहे.
खलाशांबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र
गोव्यातील सुमारे 8000 खलाशी बाहेर आहेत. त्यांना आणण्यासाठी आपण आज पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले आहे. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चाही केली होती. त्यांना आणले तर कुठे विलगीकरण करावे यावर विचार सुरू आहे. पण त्यांना लोकांमध्ये मिसळू दिले जाणार नाही. त्यांना पूर्णपणे वेगळे ठेवले जाईल. या लोकांचे विलगीकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. असेही ते म्हणाले.
रुग्णांची स्थिती सुधारत आहे
इस्पितळातील कोरोना बाधित रुग्णांची स्थिती सुधारत आहे. संशयित रुग्णांपैकी 14 जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. पुणे येथे 48 संशयित रुग्णांचे नमुने पाठविले आहेत. तर गोव्यात 7 जणांचे नमुने आहेत. हे नमुने नकारात्मक आले तर गोवा सुरक्षित झोनमध्ये येणार आहे. विविध ठिकाणी विलगिकरण करण्यात आलेल्यांवर लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत स्थिती नियंत्रणात आहे. घरात विलगिकरण करण्यात आलेल्यांच्या हातावर शिक्का मारलेला आहे. असे रुग्ण बाहेर फिरत असल्याचे दिसून आल्यास स्थानिक सरपंच, पंच, यांना माहिती द्यावी. असे रुग्ण आढल्यास त्यांना सरकारी जागेत विलगिकरण करण्यात येईल. त्यांनी आणखी काही काळ घरात थांबावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्व आमदार सक्रीय आहेत
आमदार उपलब्ध होत नसल्याचे बोलले जात असले तरी त्यात तथ्य नाही. सर्व आमदार मतदारसंघामध्ये धान्य पुरवठा व अन्य सुविधांवर लक्ष ठेऊन आहेत. आपण स्वतः त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. धान्य उपलब्ध करण्यात आले असून ते लोकांपर्यंत पोचविले जात आहे.
सरकारकडे निधी उपलब्ध आहे
कोरोना विरोधात सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध आहे. कोविड 19 खात्यात 3 कोटीपेक्षा जास्त मदत आलेली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री निधीमध्येही मदतीच्या रुपात पैसा येत आहे. लोकांना पेटीएम किंवा अन्य माध्यमातून मदतनिधी पाठविणे शक्य आहे.
तबलिगी जमात देशाला घातक
मुसलमानातील तबलिगी ही जमात देशाला मारक ठरली असून त्यांनी देशाला संकटात टाकले असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. गोव्यात या जमातीचे कुणी आले असल्यास त्याचा अहवाल प्रत्येक पोलीस स्थानकातून देण्यात यावा, अशी सूचना आपण पोलीस महासंचालकांना केली आहे. 15 मार्च अगोदर काही लोक आले होते. पण 15 मार्च नंतर कुणी आल्याची माहिती उपलब्ध झालेली नाही. जे गोव्यात आले त्यांच्यापासून सावध राहायला हवे. कोणत्या केंद्रातून हे गोव्यात आले, कुठे राहतात याची माहिती मिळाविली जाईल. त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. त्याच्याबाबत सर्व पोलीस स्थानकामधून माहिती मागविली आहे. दिल्लीत जी परिषद झाली ती घातक आहे. अशावेळी परिषद, जमाव होता कामा नये. त्याच्या विरोधात कडक कारवाई व्हायला हवी. कुणी आले असेल तर त्यांनी स्वतः विलगिकरण करावे, किंवा पोलिसांना सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.