प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी परिसराला हिडकल जलवाहिनीद्वारे थेट पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, आता जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने या परिसरात पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. परिसरात 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. हिडकल जलाशयातून शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीद्वारे कणबर्गी परिसराला पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी हिडकल जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करून बसवणकोळ जलशुद्धीकरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण सदर पाणीपुरवठा 4 ते 5 दिवसाआड करण्यात येत असल्याने कणबर्गीवासियांना हे पाणी अपुरे पडू लागले आहे. सार्वजनिक नळ नसल्याने या पाणीपुरवठय़ावरच नागरिकांना अवलंबून राहावे लागते. कणबर्गी परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या घरी जनावरे असल्याने पाणी जास्त लागते. पण पाणीपुरवठा मंडळाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा येत असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सुरळीत पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी येथील रहिवाशांनी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे अनेकवेळा निवेदन दिले. याबाबत तक्रारीही केल्या, मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जनावरांसाठी व घरात पिण्यासाठी लागणारे पाणी आणण्याकरिता नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. सार्वजनिक नळाच्या ठिकाणी गर्दी होऊन वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.