दखल न घेतल्यास आत्मदहनाचा दिला इशारा
वार्ताहर / वंदूर
कागल तालुक्यातील करनूर येथे घाटगे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रशासनाला लेखी अथवा तोंडी सांगूनही गंभीर दखल घेतली गेली नाही त्यामुळे घाटगेमळा वसाहतीतील नागरिक कुटुंबियांसह व वाहनांसह ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास बसले होते. रस्त्याबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
सुमारे 40 कुटुंबीयांची घाटगेमळा वसाहत ही गेल्या कित्येक वर्षापासून वसलेली आहे. या रस्त्यावरूनच त्यांची ये-जा सुरू असते. त्याच रस्त्यावर एकाने अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे आता घाटगे मळ्यातील नागरिकांना रस्ताच नाही. रस्त्याविना त्यांचे हाल होत आहेत. रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत नागरिकांनी ग्रामपंचायत तहसीलदार यांचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र, त्यांच्या मागणीला गांधारी प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.
यानुसार या वसाहतींमधील गरोदर महिला रुग्ण यांची रस्त्या अभावी हेळसांड होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी प्रतिसाद न दिल्याने आमरण उपोषणासारखा अवलंब करावा लागत असल्याचे सांगत रस्त्याबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही येथील जयसिंग घाटगे यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी अकराच्या सुमारास आमरण उपोषणास प्रारंभ झाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उपोषणस्थळी शंकर घाटगे, सुनील घाटगे, संजय घाटगे, ईश्वरा घोरपडे, प्रकाश घाटगे, शिवाजी साळुंखे, भारती घाटगे, साउबाई घाटगे, संगीता साळुंखे, नर्मदा घाटगे, सिंधुबाई घाटगे, उज्वला घाटगे यांच्यासह घाटगे मळ्यातील नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामसेविका योजना जंगम यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, अतिक्रमण केलेल्या इसमांना लेखी नोटीस दिलेली आहे त्यांनी तात्काळ अतिक्रमण न काढल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तसेच घाटगे मळ्यातील नागरिकांना रस्ता देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.