वार्ताहर/ कराड
कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान एप्रिल महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन शिथिल केल्याने सोमवारी जवळपास अडीच महिन्यानंतर सर्व दुकाने सुरू झाली. अत्यावश्यकप्रमाणेच सर्व दुकाने सुरू झाल्याने मोठय़ा संख्येने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्याने कराडच्या मुख्य बाजारपेठेत रौनक आल्याचे पहावयास मिळाले. अडीच महिन्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू झाल्याने व्यापाऱयांनीही समाधान व्यक्त केले आहे.
सुरुवातीपासूनच कराड तालुका कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला आहे. पहिल्या लाटेत होरपळून निघालेल्या कराड शहरासह तालुक्याला दुसऱया लाटेचाही तडाखा सहन करावा लागला. दुसऱया लाटेदरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने एप्रिलमध्ये लॉकडाऊन सुरू केले. यामुळे अत्यावश्यक वगळता सर्वच प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र सातारा जिल्हय़ातील कोरोना बाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने जिल्हाधिकाऱयांनी संपूर्ण जिल्हय़ात कडक लॉकडाऊन केले होते.
कडक लॉकडाऊन दरम्यान दवाखाने व मेडिकल वगळता जवळपास सर्वच व्यवसाय बंद ठेवले होते. केवळ किराण व भाजीपाला यासारख्या अत्यावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सुरू ठेवण्यात आली होती. यानंतर राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने जिल्हय़ातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांना दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी दिली होती. मात्र अन्य दुकाने बंदच होती. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत शुकशुकाटच जाणवत होता.
दरम्यान, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने शासनाने लॉकडाऊनमये शिथिलता देत अत्यावश्यक बरोबरच अन्य दुकानांनाही दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी दिल्याने सोमवारी बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल वाढल्याचे पहावयास मिळाले. शिथिलता मिळाली असली, तरी व्यापारी व ग्राहकांनी शासनाने कोरोनाच्या अनुषंगाने राबवलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.