स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जुलै 2020 मध्ये लागूनसुद्धा मुलाखतीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या केली. राज्यसेवा परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षा म्हणजे भुलभुलैया आहेत अशी चिठ्ठी लिहून त्याने आपले आयुष्य संपवले. वाढत चाललेले वय, नियुक्ती होत नसल्याने होणारी फरपट, त्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याने निर्माण झालेला दबाव आणि दोन वर्षाचा कोरोनाचा जगाला मागे ढकलणारा कालखंड अशी याची पार्श्वभूमी आहे. अशा काळात एखादा विद्यार्थी ज्याच्याकडे स्वतःची एक चांगली अभियांत्रिकीची पदवी आहे तो आयुष्य संपवतो, याहून दुःखद घटना नाही. स्वप्नीलच्या आईचे दुःख संपूर्ण राज्याने ऐकले आणि या प्रश्नावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे अशी सार्वत्रिक भावना निर्माण झाली. याला दुसरी एक महत्त्वाची बाजू आहे. ती म्हणजे, 1990च्या दशकात एमपीएससीची जी अवस्था होती ती अंदाधुंदी आता कमी झाली आहे. अपवाद कोरोनातील या दोन वर्षांचा. मात्र यूपीएससीने थोडीशी मोकळीक मिळताच आपल्या उमेदवारांना विमानाचे तिकीट देऊन बोलावले आणि मुलाखती पूर्ण केल्या. तसे राज्यात होऊ शकले नाही. यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असले तरीही एमपीएससीच्या प्रमुखांनी बजावलेली भूमिकासुद्धा धरसोडीची आणि आततायीपणाची होती. न्यायालयापर्यंत त्यांनी घोळ घातला. पण एकेकाळी ‘पंचवार्षिक योजना’ म्हटली जाणारी एमपीएससीची भरती आता किमान चांगल्या पद्धतीने होत आहे हे खरेच. देशाच्या कानाकोपऱयात यूपीएससी परीक्षेतून प्रत्येक वषी किमान दीडशे मराठी युवक अधिकारी बनून सेवा बजावताना दिसू लागले आहेत हे आपल्या आजच्या तरुणाईचे मोठे यश! पण तरीही स्पर्धा परीक्षा म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससी यापलीकडे काही नाही असा विचार महाराष्ट्रातील युवकांनी करणे सोडून देण्याची वेळ आली आहे. एकतर शालेय स्तरापासून आपल्या विद्यार्थ्यांची तशी जडण-घडण होत नाही. आर्ट्स कॉमर्स करा आणि तेव्हापासूनच स्पर्धापरीक्षेची तयारी करा असा एक भलता उपाय सुचवला जातो. पन्नास-शंभर ते तीनशे जागांच्या भरतीसाठी चार-पाच लाख विद्यार्थी प्रयत्न करतात. पाच टक्केहून कमी विद्यार्थी मुलाखतीपर्यंत पोहोचतात आणि एक ते दोन टक्केच अधिकारी बनतात. आरक्षण आणि खुल्या जागातही अन्यायाची भावना आहे ती वेगळीच. याचा अर्थ 99 टक्के लोक हे विविध कारणांनी निराश, अपयशी होणारच आहेत. हे वास्तव पुणे मुंबईपासून ग्रामीण पातळीपर्यंत स्पर्धा परीक्षांचा बाजार भरवणारे सांगत नाहीत. पूर्वी स्पर्धा परीक्षेत मराठी टक्का वाढवावा म्हणून प्रेरणादायी वक्ते आवश्यक असायचे. आता ती संख्या वाढली. मात्र वास्तव सांगायचे ते विसरतात किंवा टाळतात. परिणामी या क्षेत्रात संधी आहे तितकीच स्पर्धा आहे आणि अपयश नक्कीच मोठे आहे, या वास्तवाचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवला जात नाही. प्रेरक भाषण देणाऱया व्यक्तीकडे पाहून मीही यूपीएससी करणार, कलेक्टर, एसपी होणार असे ठरवणारी मुले यूपीएससीत नापास होतात पण एमपीएससीत उपजिल्हाधिकारी, उपाधीक्षक होण्याची संधी टाळतात. एमपीएससी करणारे तसेच लिपिक, टंकलेखक, रेल्वे, बँकिंगमधील संधी दवडतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम आणि दक्षिण भारतात रेल्वेपासून राष्ट्रीयीकृत बँकापर्यंत बिहार आणि उत्तर प्रदेशातील विद्यार्थी दिसतात. कलेक्टर नाही झालो तर त्यांची गार्डमन व्हायची आणि तिथली नोकरी करून पुन्हा स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी आहे. ती जिद्द निर्माण करायला आपले अधिकारी, क्लास चालक तयार आहेत का? स्पर्धा परीक्षेची बाजारपेठ त्यांना तसे करू देत नाही. वारंवार अपयश आलेली मुले ना गावाकडे परतू शकतात, ना शहरात काही घडवू शकतात. घोळक्मयातून जेव्हा ते एकांतात जातात तेव्हा निराश होऊन आयुष्य संपवतात असे वारंवार घडते. राज्यातील अशाच परिस्थितीमुळे स्वप्नीलचे उदाहरण पुढे आले मात्र इतरांच्या दुःखाला वाचा फुटली नाही. ही स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही. इथले ज्ञान घेऊन आपण वेगळय़ा क्षेत्रात यशस्वी होऊ, आपल्या लहान भाऊ, बहीण आणि आई-वडिलांची जबाबदारी आहे, या संकटातून तरू, यशस्वी होऊ आणि वेगळे जगून दाखवू हीच जिद्द निर्माण करणारे प्रेरक आता हवे आहेत. फारूख नाईकवाडे यांच्यासारखे लेखक, प्रेरक पूर्वी महाराष्ट्रभर प्रेरणा देत फिरायचे. अलीकडे त्यांनी क्लास चालकांना यशस्वीप्रमाणे अपयशी मुलांना आम्ही कसे आयुष्याच्या योग्य मार्गाला लावले हे सांगा, असा आग्रह धरणे सुरू केले आहे. मात्र असा विचार करणारे आपल्याकडे कमीच. परिणामी स्वप्नीलसारखी मुले वाळूच्या कणाप्रमाणे हातातून निसटत आहेत. ही मुले आपल्या राज्याची, राष्ट्राची संपत्ती आहेत. त्यांना जपले पाहिजे, दिशा दिली पाहिजे. पण देणार कोण? एमपीएससीने ही जबाबदारी उचलली पाहिजे. आजपर्यंत केवळ क्लास घेणाऱयांनी यशस्वीतेचे तंत्र शिकवले पाहिजे. प्रेरक भाषणाऐवजी अभ्यासक्रमावर,तंत्रावर प्रत्यक्ष भर द्यायला सुरुवात केली पाहिजे. अत्यंत हुशार विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी आणि लाल दिव्याच्या प्रेमात पडत नाहीत. कमी गुण असणारेही तिकडे फिरकत नाहीत. मध्यम यश मिळणारे यात पिचत आहेत. अभियांत्रिकीसारखे क्षेत्र आता नोकरी देणारे उरले नसल्याने बहुतांश मुले स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत. तिथेही यश मिळाले नाही तर सगळेच संपले अशी भावना होऊन ते जीवाचे बरे वाईट करून घेतात. या युवकांना सावरले पाहिजे. करिअर म्हणजे आत्महत्या ठरू नये हे या क्षेत्रातील प्रबोधन करणारे सांगत आहेत. पण या बाजारावर अवलंबून असणाऱयांनीही आता ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास वाया जात नाही, त्यातून इतर अनेक क्षेत्राची दारे खुली होतात. तो रस्ता दाखवणारे हवे आहेत.
Previous Articleगलोल सोडण्याची मुलांकडून शपथ
Next Article निस्सान मोटर इंडियाचा उत्पादन वाढीवर भर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.