मुख्यमंत्र्यांना पत्र : 93 खलाशांचा समावेश : गोव्यात आणण्याची मागणी : जहाजावरील एकालाही कोरोना नसल्याचा दावा
प्रतिनिधी / पणजी
मुंबईत सध्या नांगरून ठेवलेल्या ‘कर्णिका’ या 450 समुद्र प्रवाशांतील 93 गोमंतकीय प्रवासी तथा खलाशी असलेल्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र पाठवून मदत करण्याची हाक दिली आहे. बोटीवरील एकाही व्यक्तीला कोरोना महामारी झालेली नाही तेव्हा आम्हाला थेट मुरगाव बंदरात घ्या, अशी मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार गोवा सरकारने भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विदेशातून येणाऱयांना थेट मुंबई बंदरात उतरवून घ्यावे लागेल व त्यांची थेट विलगीकरणासाठी निश्चित केलेल्या खोल्यांमध्ये पाठविण्याची शिफारस केलेली आहे. या जहाजावरील 93 गोमंतकीयांना थेट गोव्यात मुरगाव बंदरात यायचे होते. गोवा सरकारने जहाज मुंबईत ठेवा आणि तिथेच नियमानुसार नोंदणी करून घेण्यास सांगितले होते.
जहाजावरील इस्पितळाचे प्रमाणपत्र सादर
या जहाजावरील 450 पैकी 93 गोमंतकीय आहेत व त्यांनी आपल्याला वा जहाजावरील एकाही व्यक्तीला कोरोना महामारी झालेली नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रातून केला आहे. मुख्यमंत्र्यानी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताना त्यांनी जहाजावरील इस्पितळाचे प्रमाणपत्रही लावलेले आहे. हे जहाज यापूर्वी 1 मार्च 2020 रोजी मुंबई ते दुबईच्या दरम्यान 124 प्रवाशांना घेऊन प्रवास करून आलेले आहे. हाच या जहाजाचा अखेरचा प्रवास होता. हे जहाज 5 मार्च रोजी दुबईला पोहोचले. तिथे सर्व प्रवाशांना उतरविले व कोविड-19 ची महामारी लक्षात घेऊन एकही प्रवासी न घेता मुंबईला निघाले. 12 मार्च रोजी जहाज मुंबईत पोहोचले. या जहाजावरील सर्व खलाशी व इतर कर्मचाऱयांची मुंबईत सीपोर्ट पब्लिक हेल्थतर्फे तपासणी झालेली आहे. तरीदेखील सर्व कर्मचारीवर्गाचे कोविड-19च्या धर्तीवर विलगीकरण करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जर अद्याप तपासणी करायची असल्यास करू शकते व यावर आता मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी कर्मचारीवर्गाने केली आहे.