ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांची मागणी : सरकारने लक्ष घालणे आवश्यक
प्रतिनिधी / बेळगाव
मराठा समाजाचे हीत साधून उद्धार करण्यासाठी प्राधिकरणाचे गाजर दाखविणे म्हणजे केवळ धूळफेक आहे. कर्नाटक सरकारने हे प्रकार थांबविले पाहिजेत. मराठा समाजाला सरकारने तातडीने 2 ‘अ’ आरक्षण द्यावे. हीच गरज आहे, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी केली आहे.
मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठे आंदोलन केले. महराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातील बेळगावातही मराठा समाजाचा मूक महामोर्चा झाला. सरकारने दोन ‘अ’ वर्गात आपले वर्गीकरण करावे. हीच या समाजाची प्रमुख मागणी आहे. मात्र आरक्षण देण्याऐवजी प्राधिकरण स्थापन करून कल्याण निधी देण्याचे गाजर दाखविले जात आहे. कर्नाटकात मोठय़ा संख्येने असलेल्या एका समाजाच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचाच हा प्रकार असून सरकारने व मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातही मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. न्यायालयात अडकून पडला आहे. खरेतर मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभेत ठराव संमत करून तो पुढे मंजुरीसाठी पाठवायला हवा होता. मसुदा संमत करण्यास विलंब करून न्यायिक वाद निर्माण होण्यास अवधी देण्यात आला. आता वादाचे आणि आरक्षण न मिळण्याचे खापर मात्र दुसऱयांवर फोडले जात आहे. असा प्रकार कर्नाटकातील भाजप सरकारही करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आरक्षण मिळविणे मराठा समाजाचा अधिकार
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मराठा समाजाला आहे. कर्नाटकात शेकडो वर्षांपासून मराठा समाज अस्तित्वात आहे. आरक्षण मिळविणे हा या समाजाचा अधिकार आहे. हा अधिकार मराठा समाजाला मिळावा म्हणून आपण स्वतः वारंवार पाठपुरावा करीत आहे, तरीही या समाजाला या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. हे पूर्णपणे चुकीचे आणि अन्यायकारक असल्याचे आर. व्ही. देशपांडे म्हणाले.