बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील ब्राम्हण समुदायाने शालेय पाठयपुस्तकातील काही मजकुरामुळे त्यांचा धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. आता तो भाग हटविण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस.सुरेश कुमार यांनी इयत्ता ६ वी च्या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकातील वादग्रस्त परिच्छेद हटविण्याचे आदेश दिले आहेत.
पाठ्यपुस्तकात वरील संदर्भ अप्रासंगिक व अयोग्य आहे, असे या आदेशात म्हटले आहे. तो भाग त्वरित अभ्यासक्रमातून काढून टाकले पाहिजे.
कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळाच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसमवेत हा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती आहे. ब्राह्मणांनी केलेल्या “हवन” दरम्यान कृषी प्राण्यांच्या बलिदानामुळे वैदिक काळामध्ये अन्नाची कमतरता असल्याचे पाठ्यपुस्तकात म्हटले आहे. याविषयी बोलताना मंत्री सुरेश कुमार यांनी राघवेंद्र स्वामी यांनी दूरध्वनीवर संवाद साधला. अशा गोष्टींनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असे ते म्हणाले.
तज्ज्ञ समितीची स्थापना
मंत्री कुमार यांनी कर्नाटक टेक्स्ट बुक सोसायटीला एक तज्ञ समिती तयार करण्याचे आणि वर्ग १ ते १० पर्यंतच्या सामाजिक विज्ञान आणि भाषेच्या पुस्तकांचे विश्लेषण करण्याचे निर्देश दिले आहेत. समितीमध्ये शिक्षक आणि विषय तज्ज्ञांचा समावेश असेल जो सामाजिक विज्ञान आणि भाषा संबंधित सर्व मजकूर पुस्तकांचा आढावा घेऊन सरकारला अहवाल देईल.