बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारने विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण न करता राज्यात शाळा सुरु केल्या. यांनतर कर्नाटक उच्च न्यायालयाने पाठ्यपुस्तके वितरित न करता शाळा सुरु करून काय उपयोग असा सवाल केला होता. तसेच लवकरात लवकर पाठय पुस्तके वितरित करण्याचे आदेशही दिले होते. दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या छपाई आणि वितरणामध्ये विलंब केल्याबद्दल राज्य सरकारला सूचना केल्याच्या तीन आठवड्यांनी कर्नाटक पाठ्यपुस्तक सोसायटीने (केटीबीएस) दावा केला आहे की, त्यांनी ८६.६७ टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण केले आहे.
केटीबीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, १६ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३४ शैक्षणिक जिल्ह्यांमधील एकूण ५.३४ कोटी पाठ्यपुस्तकांपैकी ४.६३ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. त्यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे ” असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
यामध्ये गदग शैक्षणिक जिल्ह्यात ७२.८८ टक्के, धारवाड ७५.८५ टक्के, उत्तरा कन्नड ७६.७५ टक्के आणि हावेरी ७७.३० टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण झाले आहे. तर दुसरीकडे, बेंगळूर दक्षिण ९६.८५ टक्के, बेंगळूर उत्तर ९५.९० टक्के , तुमकूर ९५.४२ टक्के आणि चित्रदुर्ग ९५.११ टक्के सर्वाधिक पाठ्यपुस्तके वितरीत झाली आहेत.